भारतात आल्यावर स्वर्गात आल्याचा अनुभव आला ! – हसीना दिलशाद अहमद

संभाजीनगर येथील हसीना अहमद यांची पाकिस्तानच्या कारागृहातून १८ वर्षांनंतर सुटका !

‘पाकिस्तानपेक्षा भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे गळे काढणार्‍यांना सणसणीत चपराक ! पाकिस्तानात भारतीय मुसलमानांचाही छळ केला जातो. यावरून ‘पाकिस्तानपेक्षा भारतात मुसलमान सुरक्षित आहेत’, हे स्पष्ट होते !

संभाजीनगर – येथील रशीदपुरा येथील रहिवासी हसीना दिलशाद अहमद (वय ६५ वर्षे) या वर्ष २००२ मध्ये नातेवाइकांना भेटण्यासाठी लाहोर (पाकिस्तान) येथे गेल्या होत्या; मात्र तेथे त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) हरवले. पारपत्राविना त्या पाकिस्तान येथे रहात असल्याचा आरोप करून पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांना कारागृहात ठेवले होते. महाराष्ट्रातील संभाजीनगर पोलिसांनी हसीना अहमद या भारतीय असल्याची पुष्टी करून तशी माहिती पाकिस्तान न्यायालयाला पाठवली. त्यानंतर पाकिस्तान न्यायालयाने २० डिसेंबर २०२० या दिवशी त्यांची सुटका केली. हसीना या २६ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथे परतल्या. या वेळी त्यांचे नातेवाईक आणि पोलीस यांनी त्यांचे स्वागत केले. मायभूमीत आल्यावर पत्रकारांशी बोलतांना हसीना म्हणाल्या, ‘‘मी अत्यंत बिकट परिस्थितीत होते. माझ्यावर पुष्कळ अन्याय झाला आहे. भारतात आल्यानंतर मला स्वर्गात आल्याचा अनुभव झाला आहे.’’