नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

आदित्य ठाकरे

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने लवकरच बैठक घेऊन सविस्तर नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. विटा येथील शिवसेना आमदार श्री. अनिल बाबर यांनी २१ जानेवारी या दिवशी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन त्यांना सादर केले. त्या वेळी आदित्य ठाकरे यांनी हे आश्‍वासन दिले.

नरवीर बहिर्जी नाईक समाधीस्थळ

या वेळी पर्यटनमंत्री ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याच पद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणार्‍या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील त्यांच्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने, तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचे समाधीस्थळ असलेल्या बाणूरगड भागाचा विकास केला जाईल.

या वेळी आमदार श्री. अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्यातील दरगोबा मंदिर परिसराच्या विकासासाठीही पर्यटन योजनेच्या अंतर्गत निधी उपलब्ध होण्याविषयी निवेदन सादर केले.