शिंदेवाडी (जिल्हा सातारा) महिला सरपंचांना गावगुंडांचा त्रास !

मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे मांडले लेखी गार्‍हाणे

सरपंचांचेही गावगुंडांना भय नसणे, हे चिंताजनक आणि दुर्दैवी !

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील धनश्री शिंदे यांनी संरपंचपदाची धुरा संभाळून ३ वर्षे झाली. या कालावधीत त्यांनी गावामध्ये समाधानकारक विकासकामे केली आहेत; मात्र काही गावगुंडांनी सरपंच हे पद गावाच्या सेवेसाठी कायमस्वरूपी आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा हेका धरला आहे. त्यामुळे धनश्री शिंदे यांच्या प्रत्येक उपक्रमात चुका काढणे, तक्रारी करणे, येता-जाता टोमणे मारणे असे उद्योग या गावगुंडांनी चालवले आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी सरपंच धनश्री शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे गार्‍हाणे मांडले आहे.