हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

१. निर्भयता 

‘पूर्वी मला छोटे छोटे निर्णय घेतांना पुष्कळ भीती वाटत असे, उदा. मुंबईत प्रवास करतांना स्थानिक रेल्वेमध्ये चढणे, न्यायालयात कायदेशीर युक्तीवाद (सबमिशन) करणे, एखादा अर्ज लिहितांना ‘तो बरोबर आहे ना ? त्यात काही चूक राहिली का ?’, असा विचार केल्याने मला ताण येत असे. त्यामुळे माझ्या छातीत गोळा येणे, मला काहीही न सुचणे, मी निराशेत जाणे, सेवेत निष्क्रीयता वाढणे, अशा प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांना मला सतत सामोरे जावे लागत असे. निर्भयता वाढवण्यासाठी देवानेच माझ्याकडून पुढील प्रयत्न करून घेतले.

अ. ज्या प्रसंगाची मला पुष्कळ भीती वाटते; पण सातत्याने त्यांना सामोरे जावे लागते, अशा प्रसंगातील नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम मी लिहून काढले. त्या दृष्टीने मी माझ्या मनाला निर्भय आणि सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला.

आ. न्यायालयात न्यायाधिशांसमोर युक्तीवाद करतांना मला भीती वाटत असे. त्यावर मात करण्यासाठी मी न्यायालयात जातांना ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) खोलीत जात असून न्यायाधीश म्हणजे साक्षात् गुरुमाऊली आहेत अन् मी त्यांच्यासमोर खटल्याची सूत्रे मांडत आहे’, असा भाव ठेवत असे.

इ. खटल्याच्या अनुषंगाने ‘न्यायाधीश किंवा विरोधी पक्ष मला काय प्रश्न विचारू शकतात ?’, याचा मी पूर्ण अभ्यास आणि सराव करून सिद्धता करत असे.

ई. मी केलेल्या सिद्धतेपेक्षा वेगळी परिस्थिती उद्भवली, तर ‘शिकण्याच्या आणि स्वीकारण्याच्या स्थितीत कसे रहायचे ?’, याचा मी सराव करत असे. शिकण्याच्या स्थितीत राहिल्यामुळे, तसेच अकस्मात् उद्भवलेला प्रसंग आणि परिस्थिती यांचा अभ्यास केल्याचा लाभ मला पुढील प्रसंगांत होऊ लागला. त्यामुळे ‘परिस्थितीत देव आहे’, याची मी अनुभूती घेतली.

वरील प्रयत्नांचा लाभ असा झाला की, न्यायालयात बर्‍याच वेळा अशी अनुभूती येते की, आपल्या बाजूने जी सूत्रे आपल्याला मांडायची आहेत, ती सूत्रे स्वतः न्यायाधीश मांडतात. ‘देवच त्यांच्या माध्यमातून बोलत असतो’, अशी अनुभूती मी बर्‍याच वेळा घेतली, तसेच गर्दीत स्थानिक रेल्वेमध्ये चढण्याची भीती जाऊन मी आता प्रतिदिन अनुमाने ४ – ५ घंटे मुंबईच्या रेल्वेमधून प्रवास करते.

२. एकाग्रता 

माझ्यामध्ये ‘एकाग्रतेचा अभाव’ हा स्वभावदोष असल्यामुळे सर्वच ठिकाणी त्याचा परिणाम दिसून येतो, उदा. न्यायालयीन सेवेत एकाग्रता नसल्यामुळे विषयाचे आकलन होत नसे. सेवेच्या अनुषंगाने तांत्रिक गोष्टी शिकण्यास वेळ लागत असे, उदा. प्रिंट काढणे, मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याची स्थिती (केस स्टेटस्) ऑनलाईन पहाणे इत्यादी. त्याचप्रमाणे घरामध्ये स्वयंपाक करतांना माझे लक्ष केंद्रित नसल्याने मला १ घंट्याच्या ऐवजी २ – ३ घंटे लागत असत; कारण माझे हात काम करत असत; पण मन विचारांत भरकटत असे. कोणतेही काम किंवा सेवा करतांना मला आनंद मिळत नसे. माझ्याकडून कुठलीच सेवा परिणामकारक होत नसे. त्यामुळे माझ्या मनात ‘मला काही येत नाही किंवा मी काही करू शकत नाही’, असा न्यूनगंड आला होता. त्याच समवेत नकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा अभाव हे स्वभावदोष कार्यरत होते. एकाग्रता वाढवण्यातील अडचणी मी उत्तरदायी साधकांना सांगून आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यानुसार प्रयत्न केले. एकाग्रता वाढवण्यासाठी देवानेच माझ्याकडून पुढील प्रयत्न करून घेतले.

अ. माझ्या मनात एकाच वेळी चालू असलेल्या अनेक विचारांचा अभ्यास करून मी ‘त्यातील भूतकाळातील विचार, भविष्यकाळातील विचार आणि वर्तमानकाळातील विचार’, अशी विभागणी केली. त्यातील वर्तमानकाळातील सेवेचे विचार लिहून काढून वर्तमानकाळातील सेवेच्या विचारांचे प्राधान्यक्रम ठरवले.

आ. एकाग्रता वाढवण्यासाठी मी स्वयंसूचना दिल्या.

इ. प्रत्येक सेवेच्या वेळी मी मनाच्या स्थितीचा अभ्यास करून आढावा घेते.

वरील सर्व प्रयत्नांमुळे माझ्यात आत्मविश्वास वाढला असून काही अंशी एकाग्रताही वाढली आहे. ‘मला सेवेतून आनंद मिळून माझे मन हळूहळू स्थिर आणि शांत होत आहे’, अशी मी अनुभूती घेत आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (३.७.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक