सहस्रो एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकार्‍यांकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना !

  • महाराष्ट्र मंदिर महासंघाने श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या सहस्रो एकर भूमीच्या संदर्भात दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

  • १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश

धाराशिव – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या मालकीच्या सहस्रो एकर भूमी घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. याची सखोल चौकशी करून देवस्थानाची सर्व भूमी तातडीने मंदिराच्या कह्यात घेण्याविषयी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. या संदर्भात धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री. कीर्ती पुजार यांनी ३ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. यात अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांची अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांची सदस्य-सचिव, तसेच सरकारी वकील महेंद्र देशमुख यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या समितीने २५ जून या दिवशी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सर्व अभिलेखांची पडताळणी करून सखोल चौकशी करावी आणि १५ दिवसांत अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी २९ जून या दिवशी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही समिती महसूल अभिलेख, कायदेशीर गोष्टी यांची सखोल पडताळणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द करील.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

काय आहे प्रकरण  ?

तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानीदेवीला १ सहस्र ६६६.१४ हेक्टर म्हणजेच अनुमाने ४ सहस्र १२१.१४ एकर भूमी इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या भूमीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’सुद्धा लागू होत नाही. असे असतांनाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्ती यांच्या संगनमताने सहस्रो एकर भूमी लाटण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाची गंभीर नोंद घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.