सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती

सांगली, सातारा, बारामती आदी ठिकाणांहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना

तमनार वीज प्रकल्प

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी झाली आहे. वीजवाहिन्यांचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर (विद्युत् रोहित्र) अशा एकूण ६०० साहित्याची हानी झाली आहे. विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ६२ गावे बाधित झाली असून काही भागांत गेल्या ८ दिवसांपासून वीज नाही. याविषयी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महावितरणची वीजपुरवठा सेवा सुरळीत करण्यासाठी सातारा, बारामती, सांगली आदी ठिकाणांहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात पाठवली जाणार आहेत. यासाठीचे आवश्यक साहित्यही त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील वीजवितरणाच्या सद्य:स्थितीविषयी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. या बैठकीला ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महावितरणचे कोकण मंडलचे मुख्य अभियंता, सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता आदी उपस्थित होते. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेऊन तसे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे.