झाड कोसळण्यास त्याच्या भोवतीचे काँक्रिटीकरणच कारणीभूत !

बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या चौकशी समितीचा निष्कर्ष !

चेंबूर – येथे शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या मुळाशी संबंधित झाडालगत असलेले काँक्रिटीकरणच उत्तरदायी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काँक्रिटीकरणामुळे झाडाची मुळे कमकुवत होऊन ते पडण्यास कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष महानगरपालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने अहवालात काढला आहे.

१. चेंबूर येथे शालेय बसवर पिंपळाचे मोठे झाड कोसळले. यात विहान श्रीवास्तव (वय ११ वर्षे) याचा ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे आणि उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन केली. ‘समितीने वृक्षतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ?, याची शिफारस करावी’, असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले होते.

२. समितीने वृक्षतज्ञांसमवेत घटनास्थळाची पहाणी केली. पडलेल्या झाडाची मुळेही पडताळली. प्रभाग अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनही समितीने माहिती घेतली. त्यानुसार समितीने चौकशी अहवाल महानगरपालिकेकडे सादर केला.

३. बुंध्यालगतच्या काँक्रिटीकरणामुळे झाडांची पडझड होत असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नाकारले होते; मात्र काँक्रिटीकरणामुळे झाडांना इजा झाल्याचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मान्य केले.

४. समितीने अहवालात म्हटले की, पिंपळाचे झाड ६० वर्षे जुने होते. झाडाचा काही भाग पदपथाला आणि रस्त्याला लागून होता. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने मुळांना पाणी नीट पोचत नव्हते. त्यामुळे झाड कमकुवत होऊन कोसळले. यावर समितीने उपाययोजना म्हणून काँक्रिटीकरण टाळणे, झाडांच्या मुळांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे, झाडांना इजा होईल, अशी कामे किंवा सेवा वाहिन्यांचे काम झाल्यास कंत्राटदारांवर कारवाई करणे आदी पर्याय सुचवले.

चौकशी समितीच्या निष्कर्षातून ‘सुराज्य अभियाना’च्या मागण्यांना पुष्टी !

मुंबई महानगरपालिकेच्या चौकशी समितीने झाडांच्या बुंध्यालगतच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे कमकुवत होऊन कोसळत असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. याच विषयावर ‘सुराज्य अभियाना’ने सातत्याने आवाज उठवत प्रशासनाला निवेदने देऊन झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण थांबवणे, नियमभंग करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करणे आणि वृक्षसंवर्धनासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे, अशा मागण्या केल्या होत्या. समितीच्या निष्कर्षामुळे ‘सुराज्य अभियाना’च्या मागण्यांना एकप्रकारे पुष्टी मिळाल्याचे स्पष्ट होते.