(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif

सिंधू जल वाटप करार रहित केल्यावर पाकच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘पाणी’ राष्ट्रीय सुरक्षेचे सूत्र असून त्याला धोका निर्माण करणार्‍या देशाविरोधात युद्धा पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही, असे विधान पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू जल वाटप करारावरून केले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भारत पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग करत आहे !

ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारत पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग करत आहे. (पाकिस्तान जिहादी आतंकवादाचा वापर गेली साडेतीन दशके भारताच्या विरोधात युद्धासारखा करत असल्याने भारताने आता प्रत्युत्तर दिले, तर पाकचा जळफळाट का होत आहे ? – संपादक) त्यामुळे पाकिस्तानात वहाणार्‍या चिनाब नदीच्या प्रवाहाला आता अडथळा आला आहे. पाकिस्तानने भारतातील या नदीलगत विविध ठिकाणी चालू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचे निरीक्षण केले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ११५ ठिकाणांची पहाणी झाली असली, तरी गेल्या वर्षभरातील अद्ययावत माहिती अजून मिळालेली नाही. पाणी रोखण्यासाठी भारताचे वेगाने प्रयत्न चालू असल्याचे ठोस पुरावे आल्यावरच पाकिस्तान आक्रमक पावले उचलणार आहे, असे आसिफ यांनी सांगितले.

भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर्. पाटील यांनी पाकिस्तानात जाणार्‍या नदीचे पाणी वर्ष २०२८ पर्यंत पूर्णपणे थांबवण्यात येणार असल्याचे नुकतेच संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ख्वाजा आसिफ यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे.

पाकला बसत आहे फटका !

भारताने पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर पाकसमवेतचा सिंधू जल वाटप करार रहित करण्याची घोषणा केल्यानंतर सध्या पाकिस्तानातील एक तृतीयांश लोकसंख्येला त्यातही प्रामुख्याने सिंध आणि बलुचिस्तान प्रांतांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिंधू खोर्‍यातून पाकिस्तानला ८० टक्के पाणी मिळत असून त्याच पाण्यावर ८० टक्के भूमीवर केल्या जाणार्‍या शेतीलाही मोठा फटका बसला आहे.

संपादकीय भूमिका

आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात पाकची काय स्थिती झाली आहे, हे त्याला ठाऊक आहे. जर त्याला पुन्हा युद्ध करायचे असेल, तर आता भारताने पाकचे ४ तुकडे करूनच ते थांबवावे !