सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी वापरलेल्या साहित्याचे प्रदर्शन पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ पार पडला. २८.५.२०२६ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात यज्ञामध्ये वापरलेले साहित्य सर्वांना पहाण्यासाठी ठेवले होते. हे प्रदर्शन पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

१. ‘सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश ठेवलेला चौरंग पाहून ‘त्या चौरंगावर शिवशंकरच विराजमान आहेत’, असे मला जाणवत होते. 

श्री. शंकर नरुटे

२. मातीचे प्रज्वलित केलेले २ दिवे पाहून दिसलेले दृश्य

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्रज्वलित केलेले मातीचे दिवे प्रदर्शनात ठेवले होते. त्यातील एका  दिव्याकडे पाहून ‘या दिव्याच्या माध्यमातून देवी आमच्या साधनेतील अंधार, म्हणजे सर्व अडथळे दूर करून साधकांना साधनेत प्रगती करण्याचा मार्ग दाखवत आहे आणि दुसरा दिवा साधकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करून चैतन्याच्या दिशेने, म्हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहे’, असे दृश्य मला दिसले.

३. देवीसाठी वापरलेले मखर

‘मखरामध्ये देवी स्थानापन्न झाली आहे आणि ती सर्वांना आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवत होते.

४. प्रदर्शन पाहून माझे मन एकाग्र झाले. नंतर माझे ध्यान लागले होते.

५. प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूंमधील चैतन्यामुळे माझ्या मनाला आनंद आणि शांती जाणवत होती.

६. यज्ञासाठी वापरलेल्या निर्जीव वस्तूही चैतन्याने भारित होऊन सर्वांना चैतन्य देतात. आपणही गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) महान् कार्यात सहभागी झालो आहोत. तेव्हा ‘भगवंत आपल्यातही चैतन्य निर्माण करील आणि आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाईल’, याची मला निश्चिती झाली.

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक