पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्‍हे

डॉ. नीलम गोर्‍हे

पंढरपूर – येथील मंदिर परिसर विकास प्रकल्पामुळे प्रभावित नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भातील प्रश्न जाणून घेण्यासाठी शिवसेना नेत्या आणि माजी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी पुनर्वसन प्रक्रियेतील अनिश्चितता, मोबदल्याविषयीची अस्पष्टता आणि उदरनिर्वाहाच्या प्रश्नांकडे नागरिकांनी लक्ष वेधले. बैठकीत ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती’चे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर, वैभव बडवे, सुनील उंबरे यांच्यासह प्रतिनिधींनी २२ रस्त्यांच्या रुंदीकरणास विरोध नसल्याचे सांगत, पुनर्वसन आणि मोबदला याविषयी प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली.

या वेळी डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, विकासकामांसाठी उपलब्ध शासकीय जागांचा पर्यायही प्रशासनासमोर मांडला आहे. पुनर्वसन प्रक्रियेत मूळ प्रभावित नागरिकांचे हित जपले गेले पाहिजे. केवळ घर किंवा दुकान देणे पुरेसे नसून त्यांचा रोजगार आणि उपजीविका यांचाही विचार होणे आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शासन स्थानिकांना विश्वासात घेऊनच पुनर्वसनाचा निर्णय घेईल. प्रभावित नागरिकांच्या प्रश्नांविषयी शासनस्तरावर पाठपुरावा करून संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल.