A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी

पाकला साहाय्य केल्याचा परिणाम !

सेलेबी एव्हिएशन

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कीयेने पाकिस्तानची बाजू घेऊन त्याला सैनिकी साहाय्य केले. याचा तात्काळ परिणाम म्हणून भारताने तुर्कीयेच्या ‘सेलेबी एव्हिएशन’ आस्थापनाला देशातून हाकलल्यानंतर त्याला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. आस्थापनाचा दावा आहे की, भारताच्या कारवाईमुळे त्याला एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात तुर्कीयेच्या आस्थापनांविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मे २०२५ मध्ये ‘सेलेबी’च्या भारतीय शाखेची सुरक्षा संमती तात्काळ प्रभावाने रहित केली. सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया ही देशातील सर्वांत मोठ्या ग्राउंड हँडलिंग आस्थापनांपैकी एक होते. हे आस्थापन विमानतळावरील विमानांच्या उड्डाणांचा समन्वय, प्रवाशांची नेआण आणि विमानांना लागणारी तांत्रिक सेवा पुरवण्याचे काम करते. हे आस्थापन प्रतिवर्षी अंदाजे ५८ सहस्र उड्डाणे आणि ५ लाख ४० सहस्र टन मालाची हाताळणी करत असे.

 एका दिवसात सर्व संपले ! – आस्थापन

आस्थापनाच्या अध्यक्षा कॅनन सेलेबिओग्लू यांनी सांगितले की, आस्थापनाने वर्ष २००० पासून भारतात त्याचे स्थान निर्माण करण्यासाठी पुष्कळ श्रम घेतले होते. ही केवळ व्यावसायिक हानी नव्हती, तर हे २ दशकांच्या कठोर परिश्रमाचे फळ होते. आम्ही प्रत्येक समस्या सोडवून हा व्यवसाय उभा केला; पण हे सर्व एका दिवसात संपले.