श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोचल्यास मंदिरे समिती आणि पुरातत्व विभाग यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रविष्ट (दाखल) करू !

  • पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला करण्यात येणार्‍या रासायनिक लेपनाचे प्रकरण

  • मंदिर महासंघ आणि वारकरी संघटना यांची चेतावणी !

डावीकडून श्री. विनोद रसाळ, श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, बोलतांना ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, श्री. सुनील घनवट, श्री. प्रसाद पंडित आणि श्री. राजन बुणगे

पंढरपूर – पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्व विभागाकडून २३ आणि २४ जून या दिवशी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला (इपॉक्सी / सिलिकॉन) वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी कडाडून विरोध केला आहे.

‘कोरोना महामारीच्या काळात केलेले लेपन पुढील १० वर्षे टिकेल’, असा दावा प्रशासनाने केला होता; मात्र अवघ्या ४-५ वर्षांतच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता भासणे, हे या रासायनिक प्रक्रियेचे अपयश सिद्ध करते. २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणार्‍या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला ? आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले ?, यांचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिरे समिती किंवा पुरातत्व विभाग यांना देता आलेले नाही. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा गंभीर धोका आहे. त्यामुळे वारकरी संत-महंत आणि मूर्तीशास्त्रज्ञ यांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी पाऊल उचलल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल. तरीही मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया लादण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’ आणि पुरातत्व विभाग यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करू, अशी चेतावणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि मंदिरे समिती यांना देण्यात आले आहे.

या प्रसंगी ‘वारकरी पाईक संघा’चे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट’चे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे जिल्हा संयोजक श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.

१० वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला सेंद्रीय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप, तर पंढरपूर येथील मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का ?

१० वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी एम्.आर्. सिंह यांनी २२ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५ या कालावधीत वज्रलेप केला होता. त्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती ज्या पाषाणात घडवली होती, त्या पाषाणाची भुकटीचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण मूर्तीमध्ये वापरण्यात आले होते. या प्रक्रियेत मूर्तीवर बेहडा, दुर्वा यांचा अर्क आणि बिब्ब्याचे तेल वापरून सेंद्रीय मिश्रणाचा वापर करण्यात आला होता. त्या काळी जर श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला सेंद्रीय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप करण्यात आला होता, तर आता पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का ? त्या वेळी करण्यात आलेली कृती जर योग्य असेल, तर आताची कृती अयोग्य आहे, असेच म्हणावे लागेल. अत्यल्प निधीमध्ये होणार्‍या सेंद्रीय लेपनाऐवजी खर्चिक रासायनिक आणि अशास्त्रीय लेपनाचा आग्रह धरून पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांना काय साध्य करायचे आहे ? या रासायनिक प्रक्रियेद्वारे खर्च होणार्‍या अधिक निधीसाठी तर हे षड्यंच रचले जात नाही ना ? अशी शंका घेण्यास निश्चित येथे वाव आहे.

मूर्तीवर रासायनिक लेपन करणे चुकीचे ! – श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ, करवीर

या संदर्भात करवीर पीठाचे श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांचे मत विचारले असता त्यांनी, ‘‘यथा देहे तथा देवे’ या उक्तीनुसार रासायनिक वज्रलेप केल्यास या पद्धतीने कोणतेही रसायन आपल्या शरीराचा दाह करते, तसेच त्या मूर्तीचा दाह होतो. त्यामुळे ‘रासायनिक वज्रलेप करू नये’, असे आमचे स्पष्ट मत आहे’’, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे शंकराचार्य यांच्यासारख्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीपेक्षा पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना अधिक कळते का ?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताे.

प्रक्रियेपूर्वी त्याच कायदेशीर उत्तरदायित्व निश्चित व्हावे ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत मूर्तीवर ४ ते ५ वेळा रासायनिक प्रयोग करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून मूर्तीची हानी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही प्रक्रियेपूर्वी त्याचे दिवाणी आणि फौजदारी उत्तरदायित्व निश्चित होणे आवश्यक आहे; त्यामुळे या प्रक्रियेत विठ्ठल किंवा रुक्मिणीमातेच्या मूर्तीला कोणतीही हानी पोचल्यास संबंधित अधिकारी आणि मंदिरे समिती यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी आणि राष्ट्रीय संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी थेट फौजदारी गुन्हे नोंदवण्यासाठी वारकरी अन् हिंदु संघटना न्यायालयात धाव घेतील.’’

संपादकीय भूमिका

प्रशासन देवतांच्या मूर्तींच्या संदर्भातील कुठलाही निर्णय धर्माचार्यांना विचारून का घेत नाही ? अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात त्यांचा असा मनमानीपणा करण्याचे धाडस झाले असते का ?