आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची पाकिस्तानच्या संदर्भातील भूमिका

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

नवी देहली – भविष्यात जर भारताने पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव केला, तर तेथील लोकांना भारताच्या प्रवाहात आणावे लागेल किंवा त्यांना त्या देशातच शांततेने जगता आले पाहिजे. यासाठी संवादाचे दरवाजे खुले ठेवणे आवश्यक आहे. आम्ही हिटलरसारखे नाही. तो आमचा स्वभाव किंवा कार्यपद्धत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी एका संवाद कार्यक्रमात केले. यातून त्यांनी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या पाकसंदर्भातील गेल्या महिन्यातील भूमिकेचे समर्थन केले. ते पुढे म्हणाले की, अन्याय आणि अत्याचार यांचा नायनाट केला पाहिजे; पण जे चांगले आहे, ते जपलेही पाहिजे.

कोणत्याही देशाविषयी संघाचे कोणतेही स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही आणि संघ केंद्र सरकारच्या भूमिकेचेच पालन करतो, यावरही प.पू. भागवत यांनी भर दिला.

काय म्हणाले होते होसबाळे ?

एका मुलाखतीत सरकार्यवाह होसबाळे यांना ‘भारताने पाकिस्तान आणि त्याच्याकडून चालू असलेल्या आतंकवादाच्या पोषणाविषयी कसा व्यवहार करावा ?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले होते की, देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान यांचे रक्षण झाले पाहिजे. सत्तेवर असलेल्या सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे; पण त्याच वेळी आपण दरवाजे बंद करू नयेत. त्यांच्याशी (पाकशी) संवाद साधण्यासाठी आपण नेहमीच सिद्ध असले पाहिजे.