कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !

  • बांगलादेशातील गायबांधा जिल्ह्यातील घटना

  • ५३ फूट उंच प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या बांधकामासह १४४ मूर्तींची चालू होती निर्मिती

  • भारताच्या गुप्तचर संघटनेच्या समर्थनातून बांधकाम झाल्याचा आरोप

AI निर्मित चित्र

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश, तसेच फ्रान्स, अमेरिका येथून कट्टर इस्लामी गट रंगपूर विभागातील गायबांधा जिल्ह्यात उभारल्या जात असलेल्या ‘सनातन धार्मिक संकुला’च्या विद्ध्वंसाची मागणी करत आहेत. या दबावापुढे झुकत बांगलादेश सरकारने या संकुलाचे बांधकाम थांबवण्याचा आदेश दिला.

येथील भगवान श्रीरामाच्या ५३ फूट उंच मूर्तीचे औपचारिक उद्घाटन २५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी राजशाही येथील भारताचे साहाय्यक उच्चायुक्त मनोज कुमार यांच्या हस्ते झाले होते. येथे श्रीराम आणि शिव (उंची २८ फूट) यांच्या मूर्तींसह देवतांच्या १४४ मूर्तींची स्थापन करण्यात येणार होती. याला कट्टरतावादी मुसलमानांकडून तीव्र विरोध होत असल्याची माहिती ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला बांगलादेशातील हिंदूंकडून आधीच मिळाली होती.

यासंदर्भात राजधानी ढाका येथील ‘वीकली ब्लिट्ज’चे वरिष्ठ संपादक सलाहउद्दीन शोएब चौधरी यांनी आधीच एक लेख लिहून याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, स्थानिक दानशूर हरिदास बाबू यांच्या पुढाकाराने स्थापित झालेला हा प्रकल्प हळूहळू एका मोठ्या धार्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय संकुलात विकसित झाला.

१९ जूनला ‘सनातन धर्म संकुला’तील मूर्ती नष्ट करण्याची कट्टरतावाद्यांची चिथावणी !

चौधरी यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना आवाहन करत म्हटले की, कृपया बांगलादेशातील भगवान श्रीराम, भगवान शिव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तींचे रक्षण करा ! पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’च्या थेट पाठिंब्याने बांगलादेशातील इस्लामवादी आणि जिहादी यांनी ‘सनातन संकुला’चे बांधकाम रोखण्यात आधीच यश मिळवले आहे. आता १९ जूनला त्या जागेवर आक्रमण करून या मूर्तींची तोडफोड करण्याचा त्यांचा कट असल्याचे समजते. बांगलादेशातील इस्लामवादी सामाजिक माध्यमांतून या मूर्तींची ‘मुंडकी छाटण्याचे’ आवाहन करत आहेत. काही जण त्याहून पुढे जाऊन ‘मूर्तींवर चढणे’ आणि ‘तोडफोड करण्यापूर्वी त्यावर लघवी करणे’, अशा कृती करण्याचे आवाहन त्यांच्या सहकार्‍यांना करत आहेत.

यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने बांगलादेशातील गाझीपूरच्या काही हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, या संकुलावर ४ सहस्र ते ५ सहस्र मुसलमानांचा जमाव चालून जाऊ शकतो आणि मूर्तींची तोडफोड करू शकतो, यात कोणतेच दुमत नाही.

देशभरात लाखो मशिदी असतांना एका हिंदु संकुलाला विरोध का ?  बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

सरकारच्या या आदेशाच्या विरोधात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आवाज उठवला आहे. त्या म्हणाल्या की, बांगलादेशात लाखो मशिदी आहेत. देशभरात नव्या मशिदींचे बांधकामही चालूच असते. मग केवळ एका श्रीराममंदिराच्या किंवा भगवान श्रीरामाच्या पुतळ्याच्या उभारणीला इतका विरोध का ? जर धार्मिक स्वातंत्र्य खरोखरच सर्वांसाठी असेल, तर ते केवळ बहुसंख्यांकांनाच नाही, तर अल्पसंख्यांकांनाही समानतेने लागू झाले पाहिजे.

त्या पुढे म्हणाल्या की, राममंदिराच्या विरोधात दिल्या जाणार्‍या धमक्या, भडकवणारी विधाने आणि द्वेषपूर्ण प्रचार अत्यंत चिंताजनक आहे. केवळ एखादे प्रार्थनास्थळ आवडत नाही; म्हणून ते पाडण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला मिळत नाही. कायद्याचे राज्य असलेल्या देशात धार्मिक मतभेद हिंसाचार किंवा रानटीपणाने सोडवले जात नाहीत.

नसरीन यांनी या गोष्टीवर भर दिला की, पलाशबारीमध्ये हिंदु मंदिरे आणि मूर्तींची तोडफोड झाल्याचा इतिहास पहाता ही परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे. या घटनांमुळे तेथील हिंदु अल्पसंख्यांक समुदाय असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासला आहे. इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, मलेशिया आणि ओमान यांसारख्या जगभरातील अनेक मुसलमानबहुल देशांमध्ये मोठी हिंदु मंदिरे आहेत. त्या देशांमध्ये मंदिरांचे अस्तित्व राज्यासाठी धोका मानले जात नाही. मग बांगलादेशात एका मंदिराच्या उभारणीकडे काही मुसलमानांकडून अस्तित्वाचे संकट म्हणून का पाहिले जात आहे ?, असा प्रश्‍नही तसरीन यांनी उपस्थित केला.

धार्मिक संकुलाच्या विरोधात होत असलेले गंभीर आरोप !

१. भारतीय प्रभावाचा कथित विस्तार : बांगलादेशासह पाकिस्तान, तुर्कीये, फ्रान्स, अमेरिका आदी देशांतील धर्मांध मुसलमानांचे गटही ‘गायबांधा धार्मिक संकुला’स विरोध करत आहेत. तसेच त्यास ‘भारतीय प्रभावाचा कथित विस्तार’ म्हणून चित्रित करण्याची ऑनलाईन मोहीमच हाती घेण्यात आली आहे.

२. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ने पुरवला निधी : कोणताही विश्‍वासार्ह पुरावा सादर न करता प्रकल्पाचे काळजीवाहू हरिश्‍चंद्र तारोनी दास यांच्यावर भारतीय गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचा आरोप केले जात आहेत. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ने या प्रकल्पासाठी निधी दिल्याचा आरोपही केला जात आहे.

३. ‘इस्कॉन’चा अपप्रचार करणारे हेच गट : विशेष म्हणजे हेच इस्लामी गट बांगलादेशात ‘इस्कॉन’चा अपप्रचार करण्यासह, संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमध्ये यांनी भूमिका बजावल्याचा आरोप आहे.

४. हे गट भारताविरुद्ध जिहाद पुकारून ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) प्रत्यक्षात आणण्यासाठी, तसेच बांगलादेशातील हिंदूंची सामूहिक कत्तल चालू करण्याचे आवाहन करत आहेत.

चौधरी त्यांच्या लेखात भीती व्यक्त करतांना म्हणतात की, वेळीच पावले न उचलल्यास बांगलादेश हे हिंदूंच्या कत्तलखान्यात रूपांतरित होऊ शकते आणि हिंसाचाराची नवी लाट किंवा अगदी नरसंहारही कोणत्याही क्षणी चालू होऊ शकतो. बांगलादेश सरकारने बांधकाम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर आता हिंदूंविरोधात आक्रमणे चालू झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको, असे आता म्हटले जात आहे.

मंदिर उभारणीचे निमित्त करून अशा प्रकारे केला जात आहे अपप्रचार !

बांगलादेशातील कट्टरतावाद्यांकडून केला जात असलेला अपप्रचार

फेसबुक आदी सामाजिक माध्यमांतून कट्टरतावादी मुसलमान अपप्रचार करत आहेत. ते म्हणत आहेत की,

१. हिंदुत्वनिष्ठ ‘अखंड भारत’ निर्माण करण्याचे स्वप्न पहातात. जरी ते साध्य करण्यात, त्यांना यश आले नाही, तरीही बांगलादेशावर ताबा मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. सनातन संकुल उत्तर बंगालमध्ये भारताच्या ‘चिकन नेक कॉरिडॉर’च्या अगदी जवळच का असावे ? २२ कोटी टाका खर्चून उभारल्या जाणार्‍या या संकुलात, देशातील सर्वांत मोठा श्रीरामाचा पुतळा (५३ फूट), शिव पुतळा (२८ फूट उंच) आणि १४४ देवतांच्या मूर्ती आधीच स्थापित करण्यात आल्या आहेत.

२. ६ टक्के हिंदु अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करत ते बांगलादेशातील ९३ टक्के मुसलमान बहुसंख्यांकांना आव्हान देत आहेत. आणि इकडे आपण मुसलमान मात्र गाढ झोपेत ‘गझवा-ए-हिंद’ची स्वप्ने पहात आहोत ! खरोखरच असे वाटते की, या देशातील मुसलमानांच्या नशिबात दुर्दैवच लिहिले आहे !!!

३. ज्या रामाच्या मंदिरासाठी भारतात बाबरी मशीद पाडली गेली, त्याच रामाचा पुतळा येथे एका मोकळ्या जागेत उभारला जात आहे !

संपादकीय भूमिका

धर्मनिरपेक्षतावादी म्हणून पाठ थोपटून घेणार्‍या बांगलादेशाने इस्लामी धार्मिक गटांच्या दबावापुढे झुकत हिंदु मंदिरांचे बांधकाम थांबवल्यावरून भारताने त्याला जाब विचारला पाहिजे. यासाठी भारतातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारवर दबाव आणणे आवश्यक !