Pakistan’s Atrocities On POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानाकडून मानवी अधिकारांचे उल्लंघन ! – भारत

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मानवी अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे, अशी प्रतिक्रिया भारताने त्या प्रांतात चालू असलेल्या हिंसाचाराविषयी व्यक्त केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेली निदर्शने आणि पाकिस्तानच्या सुरक्षादलांनी केलेली कठोर कारवाई यांविषयी पाकिस्तान खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोपही भारताने केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या हिंसचारामध्ये आतापर्यंत १२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले,

१. पाकव्याप्त काश्मीरमधील प्रकरणाविषयी पाकिस्तानकडून खोट्या बातम्या आणि व्हिडिओ पसरवण्याचा प्रकार दिसून येत आहे. हा स्वतःचे अपयश लपवण्याचा आणि मानवी अधिकारांच्या  उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.

२. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तेथील पोलीस अमानवी पद्धतीने वागत असल्याच्या बातम्या येत आहेत. तेथे झालेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्यूमुखी पडले असून काही जण घायाळही झाले आहेत.

३. आम्हाला आशा आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला त्याच्या चुकीच्या कृत्यांसाठी आणि मानवी अधिकारांच्या उल्लंघनासाठी उत्तरदायी ठरवेल.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसाचार चालूच !

स्थानिक प्रशासन आणि पाकिस्तान सरकारची अन्याय्य धोरणे, यांविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक रस्त्यावर उतरले असून ते तेथे मोठ्या प्रमाणावर; पण शांततेत आंदोलन करत आहेत. पाकिस्तानच्या सुरक्षादलांनी या आंदोलकांना आमानुष मारहाण केली, तसेच आंदोलकांवर गोळीबार केला. यासह आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडन नंतर लाठीमारही केला. याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी सैन्यावर दगडफेक केली. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी ‘ही पाकिस्तानची दडपशाही आहे’, असा आरोप केला.

संपादकीय भूमिका

ऊठसूठ भारताला हिंसक ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता पाकिस्ताच्या क्रूर कृत्यांच्या संदर्भात चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !