Clashes In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार : किमान ३० जण ठार

२०० लोक घायाळ

मुझ्झफराबाद (जम्मू-काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि पाकचे सुरक्षा दल यांच्यातील संघर्षात ३० हून अधिक लोक ठार झाले. यामध्ये २०० लोक घायाळ झाल्याचेही वृत्त आहे. या भागातील आर्थिक आणि राजकीय समस्यांवरील आंदोलनांचे नेतृत्व करणार्‍या ‘जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’ (जेएएसी) या सामाजिक संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर हा संघर्ष उफाळून आला. ५ जूनच्या रात्री सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एका व्यापार्‍याचा गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे ७ जूनला रावलकोट शहरात संघर्ष चालू झाला.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर ज्या व्यापार्‍याचा मृतदेह रुग्णालयाच्या शवगृहात नेण्यात आला होता, त्याच्या समर्थनासाठी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तिथे जमले होते. सुरक्षादलांनी निदर्शकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी सुरक्षादलांना लक्ष्य करण्यासाठी स्वयंचलित रायफल्स, पेट्रोल बाँब आणि इतर शस्त्रे यांचा वापर केला. यामध्ये ६ आंदोलक मारले गेले.

तथापि स्थानिक रहिवासी आणि ‘जेएएसी’च्या समर्थकांनी अधिकृत माहितीवर आक्षेप घेतला असून यात बळी पडलेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचा दावा केला. ‘जेएएसी’ला आतंकवादी संघटना ठरवणे हा दडपशाहीचा प्रकार असल्याचे त्याच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत ‘जेएएसी’वर बंदी घालण्याच्या प्रादेशिक सरकारच्या निर्णयाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

३० ब्रिटीश खासदारांची ब्रिटन सरकारकडे पाकव्याप्त काश्मिरातील हिंसाचार प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी !

पाकव्याप्त काश्मीरमधील सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ ९ जूनला ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड येथील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाबाहेर काश्मिरी मुसलमानांनी निषेध नोंदवला. या वेळी ‘पाकिस्तानकडून मानवाधिकारांचे जे क्रूर उल्लंघन होत आहे, त्यात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी करणारे पत्र किमान ३० ब्रिटीश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले.

 

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील मुसलमान जनतेवर भारतीय सैन्य आणि सरकार अन्याय करते, अशी ओरड करणार्‍या भारतातील उपटसुंभांना आता पाकव्याप्त काश्मीरमधील या हिंसाचाराविषयी जाब विचारा ! जर त्यांनी यावर उत्तर दिले नाही, तर त्यांना देशद्रोही घोषित करून कारागृहात डांबा !