Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू

  • मृतांमध्ये विदेशी नागरिकांचा सर्वाधिक समावेश

  • हॉटेलकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने अधिक लोकांचा मृत्यू


नवी देहली – देहलीतील मालवीय नगरामधील ‘लेमन ग्रीन रेस्तराँ’ या हॉटेलला ३ जूनच्या सकाळी लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विदेशी नागरिक अधिक आहेत. घायाळ झालेल्या ३९ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांतील १५ जणांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ज्या इमारतीला आग लागली, ती ६ मजली इमारत असून पूर्वी त्यात ‘फ्लोरिस स्टे’ हॉटेल होते. आतापर्यंत इमारतीमधून अनुमाने ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की, अनेकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. साहाय्यता कार्याच्या वेळी १० पोलीस कर्मचारी घायाळ झाले असून त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आग नेमकी कशामुळे लागली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वीज बंद होऊन इलेक्ट्रॉनिक प्रवेशद्वार बंद झाल्याने लोक आत अडकले !

इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार इलेक्ट्रॉनिक होते, जे वीज गेल्यावर बंद झाले आणि लोकांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. स्थानिक लोकांनी काच फोडून आत अडकलेल्या लोकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी दुसर्‍या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे ते घायाळ झाले. लोकांनी जवळच्या हॉटेल्समधून गाद्या आणून भूमीवर पसरवल्या, जेणेकरून वरून उडी मारणार्‍यांचे प्राण वाचू शकतील. एका महिलेने दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा हात घसरल्याने ती गाद्यांवर पडली आणि वाचली. अग्नीशमन दल येईपर्यंत स्थानिक लोक सतत साहाय्य करत होते.

 पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताविषयी दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर घायाळांना प्रत्येकी ५० सहस्र रुपयांची हानीभरपाई घोषित केली. (घायाळांना अधिक रक्कम देणे आवश्यक आहे; कारण उपचारार्थ होणारा खर्च, तसेच अपघातात विकलांग झाल्यास जीवन जगण्यासाठी अधिक पैसे लागतात. – संपादक)

६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधल्या !

तळमजल्यावर रेस्टॉरंट चालवले जात होते, तर इमारतीचा उर्वरित भाग हॉटेल म्हणून वापरला जात होता. हॉटेलमध्ये ये-जा करण्यासाठी केवळ एकच मार्ग होता.  हॉटेलमध्ये केवळ ६ खोल्या बांधण्याची अनुमती होती; परंतु येथे अवैधपणे २५ खोल्या बांधण्यात आल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • हॉटेल, वसतीगृहे, कार्यालय, खासगी आस्थापने, दुकाने यांच्या इमारतींमध्ये सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन केलेले असते, हे आतापर्यंत देशभरात झालेल्या अशा प्रकारच्या घटनांत नेहमीच समोर आलेले आहे. यानंतरही देशातील कोणतेही प्रशासन आणि सरकार जागे होत नाही आणि परत परत अशा घटना घडतात अन् लोकांचा जीव जातो. याला भ्रष्टाचार हेच सर्वांत मोठे कारण आहे !
  • या घटनेनंतरही राजधानी देहलीमध्ये प्रशासन, पोलीस आणि अग्नीशमन दल जागे होऊन नियमांची कठोर कार्यवाही करील, याची जनतेलाही शाश्वती नाही आणि त्यामुळे पुन्हा अशी घटना घडेल !