बकर्‍यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !

प्रत्येक गावात वर्षातून एकदा बळी देणार्‍या प्राण्याची दया येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (वास्तवात हिंदु श्रद्धा निर्मूलन समिती) प्राण्यांचा बळी देण्याविरुद्ध कायदा संमत करून घेतला. सरकारने तो केलाही; कारण पशूबळी हिंदू देत होते. बकरी ईदला जो बळी दिला जातो, त्यात ना क्रूरता असते ना पशूबळी ! ती तर असते कुर्बानी !! मग बिचारे ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकार कायदा करील तरी कसे ?

मीरा रोड परिसरातील एका निवासी संकुलात कुर्बानीसाठी आणलेल्या बकर्‍या

१. मीरा रोड परिसरातील वाद नेमका काय ?

मीरा रोड परिसरातील ‘जेपी इन्फ्रा’ आणि ‘पूनम इस्टेट’ यांसारख्या मोठ्या निवासी संकुलांमध्ये साधारणपणे वर्ष २०१३ पासून हा वाद चालू झाला होता; पण तो लहान प्रमाणात होता. गेल्या काही वर्षांत (विशेषतः वर्ष २०२३ आणि त्यानंतर) बकरी ईदच्या वेळी बकरे आणण्यावरून आणि तात्पुरते शेड उभारण्यावरून तीव्र वाद झाले होते. मागील वर्षांमधील वादाचे मुख्य कारण, म्हणजे काही रहिवाशांनी बकर्‍यांना निवासी इमारतींच्या उद्वाहनातून (‘लिफ्ट’मधून) नेण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला इतर रहिवाशांनी कडाडून विरोध केला होता. या सततच्या वादांनंतर सोसायट्यांनी आपापल्या आवारात बकरे आणण्यास किंवा उघड्यावर कुर्बानी देण्यास कायदेशीर बंदी घालणारे नियम (पेट पॉलिसी) सिद्ध केले होते, तरीही यंदा पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन करून अनुमाने २५ ते ६० बकरे आणून शेड बांधल्याने हा वाद पुन्हा पेटला.

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

२. भारत निधर्मी असल्याने पशूहत्या घटनाविरोधीच !

भारत हा ‘सेक्युलर’ देश असल्यामुळे कुर्बानी देणे, हा घटनात्मक अधिकार आहे. त्याला पशूहत्या वगैरे म्हणणे, म्हणजे घटनाविरोधीच आहे. वर्ष २०१३ पासून नोंदवलेल्या गुन्ह्यांत आजवर कुणासही काहीही शिक्षा झाली नाही. ती होईतो, कुर्बानी स्थगित ठेवावी, असेही न्यायालयाने म्हटलेले नाही. त्यामुळे बिचारे काय करतील ? त्यांनी आणले २५-६० बकरे. त्यावर ‘धार्मिक सलोखा’ बिघडवू पहाणार्‍या ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी हिंदूंनी चक्क डुक्कर आणला. यामुळे ‘सेक्युलर फॅब्रिक’ (धर्मनिरपेक्षता) बिघडले. शांतता बिघडली. शेवटी पोलिसांनी बकरेही पकडून नेले आणि डुक्करही ! (काय काय करावे लागते बिचार्‍या पोलिसांना…)

यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली, जर बोकड्यांचा बळी देण्यापासून बोकडांना वाचवायचे (किमान निवासी संकुलात तरी) असेल, तर डुक्कर पूजा !

३. पशूहत्या रोखण्यासाठी अंनिस वराहपूजनाचा अहिंसात्मक मार्ग स्वीकारणार का ?

‘अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातक: ।’ (अर्थ : नेहमी बकरीच्या पुत्राचा बळी दिला जातो. (बलवान प्राण्यांचा नाही.) देव दुर्बळांचाच घात करतो. (बलवानांचा नाही.)), असे अनेकेश्वरांच्या देवाविषयी म्हणता येते. एकेश्वराविषयी हे म्हणण्याचे धाडस कुणा सुभाषितकाराचे आजवर झाले नाही आणि पुढे होणारही नाही. तस्मात् खरोखरच प्राणीहत्या रोखायची असेल आणि तेही मुसलमानांना न दुखावता, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वराहपूजनाचा अहिंसात्मक मार्ग स्वीकारावा. एरव्ही अवतारांना थोतांड मानणारे किंवा शूद्रातिशूद्रांना गुलामगिरीत ढकलण्यासाठी आर्यभटांचे कारस्थान मानणारे पुरोगामी, साम्यवादी, समाजवादी आणि अंनिसवाले वराहपूजनास विरोध कदाचित् करणार नाहीत. स्मशानात वाढदिवस साजरा करणार्‍यांना आणि पशूहिंसा रोखण्यासाठी वराहपूजन करण्यास काहीच हरकत नाही. त्यांचा हा तेजस्वी त्याग भारतीय ‘सेक्युलर’ इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यात येईल.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२७.५.२०२६)

संपादकीय भूमिका

बकरी ईदच्या दिवशी लाखो बकर्‍यांची कत्तल केली जात असतांना पुरोगामी अन् अंनिसवाले कुठल्या बिळात जाऊन लपलेले असतात !