Jammu Kashmir Dispute : चीन आणि पाक यांचे जम्मू-काश्मीरवरील विधान भारताने फेटाळले

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

नवी देहली – जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न अन् अविभाज्य भाग आहेत, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या चीन दौर्‍यानंतर त्यांनी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले होते की, पाकिस्तानने चीनला जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर चीनने म्हटले की, जम्मू-काश्मीरचे सूत्र इतिहासाशी संबंधित वाद आहे आणि त्याचे निराकरण संयुक्त राष्ट्र ठरावानुसार द्विपक्षीय करारांनुसार शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गासारखे काही प्रकल्प भारताच्या अशा प्रदेशातून जातात, ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीर आणि बलपूर्वक नियंत्रण मिळवले आहे. भारताने अशा कोणत्याही प्रयत्नांना विरोध केला आहे, जे पाकिस्तानच्या नियंत्रणाला बळकटी देण्याचा किंवा त्याला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न करतात. चीन आणि पाक या देशांमध्ये कोणतीही सामायिक सीमा नाही. भारताने वर्ष १९६३ च्या चीन-पाकिस्तान सीमा कराराला कधीही मान्यता दिली नाही.

या करारानुसार पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोर्‍याचा प्रदेश चीनला दिला होता, ज्यावर त्याने वर्ष १९४८ मध्ये बेकायदेशीरपणे नियंत्रण मिळवले होते.

संपादकीय भूमिका

असे भारत किती वर्षे फेटाळत रहाणार आहे ? भारताने पाकच्या नियंत्रणातून काश्मीर मुक्त करण्यासह पाकचे अनेक तुकडे करण्यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे !