ED Vehicle Attacked : केरळम्चे माजी मुख्यमंत्री विजयन् यांच्या घरावर धाड घालणार्‍या ‘ईडी’च्या अधिकार्‍यांवर समर्थकांकडून आक्रमण

गाडीचीही केली तोडफोड

(ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय)

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – अंमलबजावणी संचालनालयाने केरळम्चे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन् यांच्या निवासस्थानासह १० ठिकाणी धाडी घातल्या. या धाडी त्यांच्या मुलीच्या ‘एक्सालॉजिक सोल्युशन्स’ आस्थापनाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात घालण्यात आल्या. यापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी रहित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. या प्रकरणात वर्ष २०२४ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. धाडीनंतर अधिकारी विजयन् यांच्या घरातून बाहेर पडत असतांना विजयन् यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यांना मारहाण केली.

पोलिसांनी अधिकार्‍यांना गाडीत बसवल्यानंतर समर्थकांनी गाडीचा पाठलाग करून दगड-विटांद्वारे तोडफोड केली. गाडीच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. सुदैवाने यात अधिकार्‍यांना कोणतीही दुखापत झाली नाही; मात्र एक पोलीस शिपाई घायाळ झाला. या आक्रमणावर विजयन् यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. (याचाच अर्थ अशा प्रकारचे आक्रमण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती किंवा त्यांनीच समर्थकांना आक्रमण करण्याचा आदेश दिला, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक)

राहुल गांधी यांना खूप समाधान मिळेल ! – पिनराई विजयन्

धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना विजयन् म्हणाले की, ईडी बर्‍याच काळापासून माझ्या घरावर धाड घालण्याचा प्रयत्न करत होती. मला वाटते की, या धाडीमुळे काही लोकांना, विशेषतः राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्तीला खूप समाधान मिळेल. काँग्रेसची भूमिका अशी आहे की, त्यांच्या स्वतःच्या पक्षाव्यतिरिक्त इतर पक्षांविरुद्ध ईडीचा हस्तक्षेप चालूच राहिला पाहिजे.

राहुल गांधी यांनी ‘पिनराई विजयन् यांच्या घरावर धाड का घातली जात नाही आणि त्यांना अटक का केली जात नाही ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

विजयन् यांनी भाजपवर टीका करतांना म्हटले की, केंद्रातील भाजप सरकार देशात विरोधी पक्षनेत्यांवर नेहमीच जाणीवपूर्वक आक्रमणे करत आहे. याविरुद्ध संपूर्ण देशात जोरदार निषेध आंदोलन झाले आहे.

संपादकीय भूमिका

  • केरळमध्ये काँग्रेसचे राज्य आल्यावर ‘ईडी’च्या अधिकार्‍यांवर आक्रमण होऊ लागले आहे, हे लक्षात घ्या !
  • जगभरासह भारतातील साम्यवाद्यांचा इतिहास आणि वर्तमान हे हिंसेचेच राहिल्याने त्यांच्याकडून तेच घडणार ! या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून कठोर कारवाईसाठी प्रयत्न केला पाहिजे !