कपूरथळा (पंजाब) येथील कारागृहात बंदीवानांकडून हिंसाचार

पोलिसांकडून लाठीमार

कपूरथळा (पंजाब) – येथील कारागृहात २३ मेच्या रात्री बंदीवानांनी बराकची (कारागृहातील खोल्यांची) तोडफोड केली. या वेळी कारागृहाच्या पायाभूत सुविधांचीही हानी करण्यात आली. तसेच कारागृहाच्या काही भागांना आग लावण्याचा प्रयत्न केला. एका बंदीवानाशी संबंधित वादातून हा प्रकार घडल्यानंतर बंदीवान आणि न्यायप्रविष्ट बंदीवान (अंडरट्रायल्स) यांच्यात हिंसक हाणामारी झाली. कारागृह प्रशासनाने भांडण थांबवण्यासाठी मध्यस्थी केली, तेव्हा बंदीवानांनी अधिकार्‍यांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या तुरुंगातील पोलीस कर्मचार्‍यांवरही आक्रमण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

परिस्थिती अधिक बिघडू नये; म्हणून कारागृहाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. ‘परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमार केला’, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली. या हिंसाचारात जीवितहानीविषयी अधिकार्‍यांनी अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही; मात्र या घटनेनंतर बाहेर किमान ५ – ६ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे दिसून आले.

संपादकीय भूमिका

देशात गुन्हा करणार्‍यांना कारागृहात डांबले, तरी त्यातील किती जणांमधील गुन्हे करण्याची वृत्ती नष्ट होते, हा एक संशोधनाचा विषय आहे, असे म्हटले, तरी सामान्य लोकांना सत्य ठाऊक आहे. उलट कारागृहात गेल्यानंतर अनेक जण अधिकच सराईत गुन्हेगार होतात, असे दिसून येते. हिंदु राष्ट्रात गुन्हेगारांकडून कठोर साधना करवून घेऊन त्यांची वृत्ती पालटण्यात येईल !