देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त सेवा करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !


‘गुरुदेवांच्या कृपेने देहली येथे डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त तेथे १५ दिवस सेवेसाठी जाण्याची संधी मला मिळाली. या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती मी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते.

१. जाणवलेली सूत्रे

कु. वैभवी भोवर

१ अ. उत्तरदायी साधकांनी सेवेसाठी येणार्‍या साधकांना ‘देहली येथील परिस्थिती आणि सेवा’ यांविषयी अवगत करणे : देहली येथे सेवेसाठी साधक जाण्यापूर्वी उत्तरदायी साधकांनी संबंधित साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग घेऊन त्यांना ‘देहली येथील परिस्थिती, मर्यादा, घ्यायची काळजी, कोणते साहित्य आणायचे’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्संगात आरोग्य आणि प्रवास, यांच्या अनुषंगाने आवश्यक अशी सूत्रेही सांगण्यात आली. त्यामुळे साधकांच्या मनाची सिद्धता आधीच झाली आणि त्यांना तेथील परिस्थितीशी सहजतेने जुळवून घेता आले. ‘सेवेतील साधकांची काळजी कशी घ्यायला हवी ? सेवेचा किती बारकाईने अभ्यास करायला हवा ?’, हे या सत्संगातून मला शिकायला मिळाले.

१ आ. सेवेतील साधकांची काळजी घेणे आणि साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण होणे : मी देहली येथे सेवेनिमित्त एकूण १६ दिवस होते. ‘हे दिवस कसे सरले ?’, ते माझ्या लक्षातही आले नाही. सेवेसाठी आलेल्या साधकांचा निवास आणि भोजन यांची व्यवस्था अत्यंत कौतुकास्पद होती. विविध भागांतून आलेले साधक एकमेकांची ओळख करून घेत होते. साधकांमध्ये अल्प कालावधीत जवळीक होऊन त्यांच्यात कुटुंबभावना निर्माण झाली. प्रत्येक जण सहसाधकामध्ये गुरुरूप पाहून त्याची सर्वतोपरी काळजी घेत होता.

१ इ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतलेल्या सत्संगात त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन : देहली येथे सेवेनिमित्त आलेल्या साधकांचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘ऑनलाईन’ सत्संग घेतला. सत्संगात सद्गुरु पिंगळेकाकांनी आम्हाला ‘प्रवासात काही अडचण आली नाही ना ? काय शिकायला मिळाले ? सेवेत अडचणी आल्या का ? आणखी चांगले काय करायला हवे ?’, असे सहजतेने विचारले. त्या सत्संगात मला सद्गुरु पिंगळेकाकांमधील ‘सहजता, प्रेमभाव, साधकांचा विचार करणे, शिकण्याची वृत्ती’ या गुणांचे दर्शन झाले. त्यांच्या सत्संगातील प्रेमळ, नम्र आणि भावमय वाणीने माझी भावजागृती होत होती.

१ ई. ‘सेवा झाल्यानंतरही साधकाची विचारपूस करायला हवी आणि ‘सेवा अधिक चांगली होण्यासाठी आणखी काय करता येईल ?’, असा आपला विचार व्हायला हवा’, हे मला या सत्संगातून शिकायला मिळाले.

२. अनुभूती 

२ अ. शारीरिक त्रास न होणे : देहली येथे थंडी आणि प्रदूषण अधिक प्रमाणात असते. अशा प्रकारच्या वातावरणाची मला सवय नसतांनाही मी देहली येथे सेवेनिमित्त असतांना आणि तिथून परत आल्यावर मला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही.

२ आ. नवीन सेवा असूनही ताण न येणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त दायित्व घेऊन सेवा करण्याची माझी पहिलीच वेळ होती. माझा काही साधकांशी प्रथमच परिचय होत होता. साधकांना सेवा दिल्यानंतर ‘त्यांना सेवेचे स्वरूप समजावून सांगणे, सेवेतील अडचणी सोडवणे, सेवेच्या नियोजनात वेळोवेळी साहाय्य करणे’, असे देहली येथील साधक चांगल्या प्रकारे करत होते. त्यामुळे नवीन सेवा असूनही मला ताण आला नाही. तेथे पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांची संख्या अल्प असतांनाही साधक अनेक सेवा दायित्व घेऊन करत होते. सद्गुरु पिंगळेकाका साधकांना करत असलेल्या मार्गदर्शनामुळे साधक दायित्व घेऊन सेवा करत होते.

२ इ. मनाच्या सकारात्मकतेत वाढ होणे : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव झाल्यानंतर देहली येथून निघत असतांना माझ्या लक्षात आले, ‘महोत्सवातील सेवेमुळे ‘माझ्या मनाची सकारात्मकता, उत्साह, व्यष्टी साधनेचे प्रयत्न, भावाची स्थिती आणि आनंद’ यांत वाढ झाली आहे. मला त्या सेवेमुळे ऊर्जा आणि बळ मिळाले आहे.’

– कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २९ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग जिल्हा (२३.२.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक