मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

‘१७.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री राजमातंगी देवी

१. ‘श्री राजमातंगी महायज्ञा’ला आरंभ झाल्यावर माझे दोन्ही पाय पुष्कळ दुखू लागले. नंतर देवीवर करण्यात येणार्‍या  कुंकुमार्चनाच्या वेळी माझे पाय दुखणे थांबले. माझे मन स्थिर झाले. मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.

सौ. आशा गंगाधरे

२. श्रीचित्‌शक्ति ( सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची ध्यानावस्था पाहून भावजागृती होणे आणि ‘देवीला प्रत्यक्ष पहात आहे’, असे जाणवणे : मी यज्ञस्थळी आल्यावर पुष्कळ चैतन्य आणि आनंद अनुभवले. माझी भावजागृती होत होती. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मला दर्शन झाले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची ध्यानावस्था पाहून माझी भावजागृती झाली. त्या वेळी ‘देवी स्थूल रूपात प्रगटली आहे आणि मी देवीला प्रत्यक्ष पहात आहे’, असे मला जाणवले.

१ इ. यज्ञातील धूर चारही दिशांना जात होता. ‘सर्वांच्या भोवती होमातील धुराचे संरक्षककवच निर्माण होत आहे’, असे मला जाणवले.

‘मला यज्ञात सहयजमान म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आणि चैतन्य अनुभवता आले’, त्याबद्दल मी तीनही मोक्षगुरूंच्या चरणी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी) कृतज्ञता व्यक्त केली.’

– सौ. आशा गंगाधरे, मुलुंड, मुंबई

१. ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ चालू असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पाहून ‘या दोघींच्या रूपात व्यासपिठावर देवीच अवतरल्या आहेत’, असे मला वाटले.

सौ. शुभांगी पात्रीकर

२. ‘हा यज्ञ देवलोकात होत आहे’, असे मला वाटत होते.

३. मला वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य जाणवत होते.

४. माझा नामजप यज्ञ संपेपर्यंत चालू होता.

५. मला पाय दुखण्याचा त्रास असूनही मी यज्ञ संपेपर्यंत ५ घंटे बसू शकले. मला ‘तेथून जाऊ नये, असे वाटत होते.

६. मी श्री राजमातंगी यज्ञाचे चैतन्य ग्रहण करू शकल्यामुळे दुसर्‍या दिवशीही माझे मन उत्साही, आनंदी आणि शांत होते.’

– सौ. शुभांगी अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२६)

१. यज्ञाच्या एक आठवडा आधीपासूनच ‘यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी आपोआप प्रार्थना होणे 

‘राजमातंगी यज्ञाच्या एक आठवडा आधीपासूनच माझ्याकडून ‘यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी आपोआप प्रार्थना होत होती. १७.५.२०२६ या यज्ञाच्या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येक १५ मिनिटांनी ‘यज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी साधकांना प्रार्थना करण्यास सांगण्यात येत होते. त्या वेळी ‘देवाने माझ्याकडून आधीपासूनच प्रार्थना करून घेतल्या’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

२. यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

सुश्री (कु.) नलिनी राऊत

अ. यज्ञ चालू झाल्यापासून हवेत पुष्कळ गारवा जाणवत होता आणि माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण वेगाने न्यून होत असल्याचे मला जाणवत होते.

आ. यज्ञ चालू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत अधूनमधून माझी भावजागृती होत होती.

इ. यज्ञातील अग्नीच्या ज्वाळांचा रंग पिवळा, लाल आणि पांढरा दिसत होता.

ई. यज्ञ चालू झाल्यावर यज्ञाचा धूर देवद आश्रमात सर्वत्र पसरल्याचे दिसत होते. एकदा काही क्षण मला यज्ञाच्या धुराचा सुगंधही आला.

उ. यज्ञात देवीला वस्त्र अर्पण करत असतांना ‘श्री राजमातंगीदेवीने प्रत्यक्ष येऊन ते वस्त्र स्वीकारले आहे’, असे मला जाणवले.

ऊ. पूर्ण यज्ञात माझ्या मनाला पुष्कळ शांत जाणवत होते.

ए. निवेदक राजमातंगी देवीविषयीची माहिती सांगत असतांना ‘केवळ गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे आपल्याला इतके दुर्मिळ ज्ञान ऐकायला मिळत आहे’, असे वाटून मला गुरुमाऊलींच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

‘केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच मला यज्ञ पहाण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०२६)

‘राजमातंगी महायज्ञा’निमित्त अर्पण गोळा करण्याची सेवा करतांना साधिकेला झालेले त्रास आणि आलेली अनुभूती !

प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने राजमातंगी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. ‘यज्ञाचे स्थळ आणि दिवस नक्की झाल्यावर आपल्याला त्या सेवेमध्ये सहभागी व्हायला मिळणार’, याचा मला आनंद झाला; मात्र मार्च २०२६ मधील दुसर्‍या आठवड्यापासून मला वेगवेगळे शारीरिक त्रास होऊ लागले. यज्ञासाठी अर्पण गोळा करण्याची सेवा करतांना मला झालेले त्रास आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

श्रीमती स्मिता नवलकर

१. झालेले त्रास

अ. एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात माझे दोन्ही गुडघे पुष्कळ दुखू लागले. चालतांना, जिने चढ-उतर करतांना, तसेच आसंदीत बसल्यावर उठतांना मला तीव्र वेदना व्हायच्या. त्यावर आयुर्वेदीय उपचार केल्यावर मला होणारा त्रास थोडा उणावला.

आ. माझा डोळ्यांनी न दिसण्याचा त्रास वाढला. त्यामुळे मला वाचायला आणि लिहायला अडचण येऊ लागली. त्यासाठी रुग्णालयात जाऊन डोळ्यांच्या चाचण्या केल्या. त्यात ‘दोन्ही डोळ्यांच्या पडद्याला (‘रेटिना’ला) सूज आली आहे’, असे मला कळले.

इ. मला थोडेही चालतांना आणि बोलतांनाही दम लागायचा. त्यासाठी मला उपचार घ्यावे लागले आणि बर्‍याच वैद्यकीय चाचण्याही कराव्या लागल्या. त्या वेळी मला पुष्कळ थकवा जाणवायचा.

मी मला होणार्‍या त्रासावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर मला थोडे बरे वाटले.

२. अनुभूती

२ अ. सेवेला जाण्यापूर्वी ४ – ५ वेळा जुलाब होणे, गोळी घेतल्यावर बरे वाटणे, गुरुदेवांनी आतून सेवेला जाण्याची प्रेरणा देऊन सेवा करून घेणे आणि चांगला प्रतिसाद मिळणे : थोडे बरे वाटल्यावर मी यज्ञासाठी अर्पण गोळा करण्याची सेवा चालू केली. ३०.४.२०२६ या दिवशी मी सेवेला निघायच्या दीड घंटा आधी मला ४ – ५ वेळा जुलाब झाले. ‘आता सेवेला जाता येणार नाही’, असे मला वाटले. त्या वेळी ‘चार अर्पणदात्यांनी ‘आजच या. नंतर आम्ही भेटणार नाही’, असे सांगितल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी जुलाब थांबण्याची गोळी घेतली. एका घंट्याने मला थोडे बरे वाटले. त्या वेळी देवाने मला विचार दिला, ‘सेवेला जा.’ त्याप्रमाणे मी सेवेला गेले. त्या दिवशी चारही अर्पणदात्यांनी चांगले अर्पण दिले आणि ‘यज्ञाला येतो’, असेही मला सांगितले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी सेवेला जाऊ नये; म्हणून अनिष्ट शक्तींचे माझ्यावरील हे आक्रमण होते.’ गुरुदेवांनी मला आतून प्रेरणा देऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. मला दिवसभरात जराही त्रास झाला नाही. ‘या सेवेतून मला आनंद मिळाला’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती स्मिता सुबोध नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.५.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक