गोव्यातील यज्ञाची स्पंदने मुंबई आणि वाराणसी इथपर्यंत : अध्यात्मशास्त्राचा अद्भुत अनुभव !

१७ मे या दिवशी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ पार पडला. त्या पार्श्वभूमीवर...

आज विज्ञानाच्या युगात आपण उष्णता, ध्वनी, वीज, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचा अभ्यास करतो; पण सहस्रो वर्षांपूर्वी ऋषींनी शोधलेले ‘यज्ञशास्त्र’ हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून एक सूक्ष्म आध्यात्मिक विज्ञान आहे, हे अनेकांना ठाऊक नाही.

संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी संपन्न होत असलेला गोव्यातील सनातनच्या आश्रमातील एक यज्ञ !

एका बॉयलरची उष्णता काही मीटरपर्यंतच जाणवते, वातानुकूलित यंत्राची थंड हवा खोलीबाहेर परिणाम करत नाही, ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादित अंतरापर्यंतच ऐकू येतो, ‘वाय-फाय सिग्नल’लाही ठराविक मर्यादा असते. ही सर्व भौतिक ऊर्जा अंतर आणि पदार्थांच्या मर्यादेत कार्य करते. मग गोव्यात केलेल्या एका यज्ञाचे सकारात्मक परिणाम मुंबई आणि वाराणसी यांसारख्या दूरच्या शहरांत कसे जाणवू शकतात ? हाच प्रश्न अनेक बुद्धीप्रामाण्यवादी लोकांना पडणे स्वाभाविक आहे !

श्री राजमातंगी महायागाच्या वेळी पूर्णाहुती देतांना श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि अन्य पुरोहित

१. यज्ञ म्हणजे सूक्ष्म ऊर्जा निर्माण करणारे आध्यात्मिक विज्ञान !

सनातन संस्थेच्या आध्यात्मिक संशोधनानुसार यज्ञामध्ये उच्चारले जाणारे वेदमंत्र, अग्नीत अर्पण होणारे सात्त्विक पदार्थ आणि साधकांचा भाव यांमुळे सूक्ष्म सात्त्विक स्पंदने निर्माण होतात. ही स्पंदने केवळ वातावरण शुद्ध करत नाहीत, तर मानवी मनावरही सकारात्मक परिणाम घडवतात. गोव्यात पार पडलेल्या यज्ञाच्या वेळी आधुनिक सूक्ष्म संशोधन उपकरणांद्वारे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आणि सात्त्विकतेत वाढ झाल्याचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे या स्पंदनांचा परिणाम मुंबई आणि वाराणसी इथपर्यंत जाणवल्याचे आध्यात्मिक संशोधनात नमूद करण्यात आले आहे. हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर अध्यात्मशास्त्राच्या सूक्ष्म कार्यपद्धतीचे उदाहरण मानले जात आहे.

श्री. नारायण नाडकर्णी

२. मानवजातीसाठी यज्ञ का आवश्यक ?

आज जगात ताण, नैराश्य, हिंसा, असुरक्षितता आणि मानसिक अस्थिरता वाढत आहे. विज्ञानाने भौतिक सुख दिले; पण अंतर्मनातील शांतता देण्यात ते मर्यादित ठरते. अशा काळात यज्ञ हे केवळ धार्मिक विधी नसून मानसिक शांती, वातावरणशुद्धी आणि सामूहिक कल्याणासाठीचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय आहेत.

यज्ञातून निर्माण होणारी सात्त्विक ऊर्जा मन शांत करते, नकारात्मकता न्यून करते आणि समाजात सौहार्द वाढवण्यास साहाय्य करते. म्हणूनच आपल्या ऋषींनी यज्ञाला ‘लोककल्याणाचे माध्यम’ म्हटले आहे.

३. १७ मे या दिवशी मुंबईत झालेला भव्य महायज्ञ

गोव्यातील यज्ञातून अनुभवलेल्या सकारात्मक स्पंदनांच्या पार्श्वभूमीवर १७ मे या दिवशी मुंबईमध्ये भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात मानसिक शांतता, सकारात्मकता आणि आध्यात्मिक संरक्षण यांची आज अधिक आवश्यकता आहे. हा महायज्ञ केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून संपूर्ण समाजासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे. आपणही या दिव्य कार्यात सहभागी होऊन स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी शांतता, चैतन्य अन् ईश्वरी कृपा अनुभवली असेल.

हेच ते प्राचीन आध्यात्मिक विज्ञान आहे, जे केवळ बाह्य वातावरण शुद्ध करत नाही, तर मानवी चेतना, विचार आणि मनालाही सात्त्विकतेकडे प्रवाहित करते. आधुनिक विज्ञान जिथे भौतिक ऊर्जेचा अभ्यास करते, तिथे यज्ञ मन, वातावरण आणि सूक्ष्म स्पंदनांच्या परस्परसंबंधांचा अनुभव देतो. त्यामुळे यज्ञ ही केवळ धार्मिक कृती नसून मानवकल्याणासाठीची एक सूक्ष्म आध्यात्मिक प्रक्रिया आहे.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.