विशेष संपादकीय – ढळढळीत सत्य : भोजशाळा मुक्त !

भोजशाळा : जल्लोष !

मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर असल्याचा इंदूर उच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा हा स्वयंस्पष्टच आहे. अगदी एखादी अंध व्यक्तीही राजा भोजने उभारलेल्या या मंदिरातील पाषाणाला हात लावून ते मंदिर असल्याचे सांगू शकेल, इतके सर्व स्पष्ट आहे; पण भारतीय लोकशाहीत हेसुद्धा सिद्ध करावे लागले. लोकशाहीतील या संघर्षातही वाग्देवीच्या भक्तांनी विजय मिळवला. अगदी वसंतपंचमीच्या दिवशीही संपूर्ण दिवस पूजेच्या अधिकारासाठी हिंदूंना रस्त्यापासून न्यायालयापर्यंत झगडावे लागले, तेथे नमाजपठण शासकीय सुरक्षेत होत होते. हिंदुस्थानातील हिंदूंनी दयनीय स्थिती माता शारदेने पाहिली असेलच; म्हणून तेथील प्रत्येक पाषणाने देवी सरस्वतीच्या अस्तित्वाचे पुरावेच्या पुरावे पुढे आणले. हा न्यायालयीन विजय संयतपणे पूजेसाठी झगडणार्‍या हिंदूंपासून आंदोलनकर्ते आणि न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ते यांचाच आहे. याचे श्रेय अन्य कुणालाही नाही ! राजकीय इच्छाशक्तीने हे आधीच होऊ शकले असते; पण ते आज धर्मनिष्ठ हिंदूंच्या संघर्षामुळे होत आहे. वाग्देवीची मूर्ती तेथे प्रतिष्ठापित होईपर्यंत हा संघर्ष चालूच राहील.

हिंदूंनी ५०० वर्षे श्रीराममंदिरासाठी संघर्ष केला, भोजशाळेसाठी १०० वर्षे दिली, तरीही अद्याप काशी-मथुरा मुक्त होणे शेष आहे. खरेतर इतकी वर्षे भोजशाळेत हिंदूंना पूजा करण्यास सीमित अधिकार मिळणे आणि नमाजपठण होणे, हा स्वतंत्र भारतातील हिंदूंच्या श्रद्धेचा अनादर आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर नियंत्रण मिळवण्यास धर्मांधांना भीती वाटत नाही, त्याला कारणही व्यवस्थाच आहे. आतातरी व्यवस्थेच्या मतीची जडता भंगावी आणि हिंदूंच्या श्रद्धेविषयी चुकीचे दावे करणार्‍यांना शिक्षा अन् त्यांना आंजारून गोंजारून ठेवणार्‍यांना दंड करण्याची मती व्हावी, हीच माता वाग्देवीच्या चरणी प्रार्थना !