Agni Missile : एकावेळी एकापेक्षा अधिक अणूबाँब वाहून नेऊ शकणार्‍या आंतरखंडीय ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करता येणार

भुवनेश्वर (ओडिशा) – भारताने ८ मे या दिवशी एकाच वेळी अनेक अणूबाँब वाहून नेणार्‍या आंतरखंडीय ‘अग्नी ५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रामध्ये ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री-एंट्री व्हेईकल’ प्रणाली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक अणूबाँब वाहून नेता येतात. तसेच एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करता येतो. चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने वेगवेगळ्या ठिकाणी असलेली अनेक लक्ष्ये यशस्वीरित्या भेदली. ही सर्व लक्ष्ये हिंद महासागर क्षेत्रात पसरलेली होती.

अग्नि क्षेपणास्त्र भारताचे दुसरे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची मारकक्षमता अनुमाने ५ सहस्र ते ७ सहस्र किलोमीटरपर्यंत आहे. याचा वेग इतका अधिक आहे की, शत्रूचे रडार (रेडिओ लहरींच्या साहाय्याने वस्तू शोधण्याची आणि त्यांचे अंतर मोजणारी यंत्रणा) आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली यांना ते रोखणे जवळजवळ अशक्य आहे.

हे क्षेपणास्त्र दीड टनपर्यंत अणूबाँब वाहून नेऊ शकते. याचा वेग ‘मॅक २४’ आहे, म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा २४ पट अधिक आहे. एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या अनेक लक्ष्यांना एकाच क्षेपणास्त्राद्वारे नष्ट केले जाऊ शकते. जगातील अमेरिका, रशिया, चीन, भारत, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्याकडेच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान आहे.

‘अग्नी-५’च्या प्रक्षेपण प्रणालीमध्ये ‘कॅनिस्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे क्षेपणास्त्र कुठेही सहजपणे ने-आण केले जाऊ शकते. यामुळे देशात कुठेही ते तैनात केले जाऊ शकते.