Sanatan Prabhat Exclusive : महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्री असलेल्या नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

  • गावातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आदी विनाप्रक्रिया सोडले जाते नदीत

  • शुद्धीकरणासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता

श्री. अजय केळकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

कोल्हापूर – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे शक्तीपीठ असलेल्या शहरातील पंचगंगा नदी, वारकर्‍यांसाठी पवित्र असलेली पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी, पुण्यातील मुळा-मुठा नदी, लवकरच आता जिथे कुंभमेळा होणार आहे त्या नाशिकमधील गोदावरी यांसह राज्यातील तीर्थक्षेत्रांशेजारील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. इतकेच नव्हे, तर राज्यातील ५३ नद्या या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. प्रक्रिया न करता शहरे आणि गावांमधील सांडपाणी थेट नदीत सोडणे, कारखान्यांमधील पाणी शुद्धीकरण न करता औद्योगिक सांडपाणी थेट नदीत सोडणे यांसह उघड्या डोळ्यांनी दिसणार्‍या गोष्टींवर प्रदूषण मंडळ अन् स्थानिक प्रशासन यांनी केवळ तोंडदेखली कारवाई केल्याने नद्या प्रदूषित झाल्या आहेत.

वर्ष २०२५ च्या आकडेवाडीनुसार महाराष्ट्रात साधारणत: ९० कोटी लिटर सांडपाणी निर्माण होते. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक पाणी प्रकिया न करता थेट नदीत सोडले जाते. आळंदी येथील इंद्रायणी इतकी प्रदूषित झाली आहे की, वारीच्या काळात वारकर्‍यांनी ‘या पाण्याने स्नान करू नये, त्यामुळे त्वचारोग होऊ शकतात’, असे फलक नगरपालिका प्रशासन लावते. यापेक्षा नामुष्कीची गोष्ट कोणती असेल !

आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची नदी असूनही पंचगंगा शुद्धीकरणासाठी प्रयत्न नाहीत !

श्री. अजय केळकर

कोल्हापूर शहरासाठी वरदायिनी असलेल्या आणि ५ नद्यांनी मिळून होणार्‍या पंचगंगा नदीत शहरातीलच प्रमुख नाले थेट नदीत मिसळतात. एका अहवालानुसार कोल्हापूर शहरात प्रतिदिन ११०० लाख लिटर प्रक्रिया न केलेले पाणी सिद्ध होते. यापैकी १७० लाख लिटरहून अधिक पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळते. शहरात असलेल्या विविध नाल्यांच्या शुद्धीकरणाची कोणतीच प्रक्रिया नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीत मिसळल्याने केवळ नागरिकांच्या आरोग्यावर नव्हे, तर जलचरांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. प्रतिवर्षी तेरवाड येथील बंधार्‍यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मासे मृत्यूमुखी पडतात; मात्र याचे कोणतेही सुवेरसुतक प्रदूषण मंडळाला नसते. ते नेहमीप्रमाणे ‘दूषित’ पाण्याचे नमुने घेतात; कागदी घोडे नाचवतात आणि निघून जातात. या नदीच्या प्रदूषणाचे खापर महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ नेहमीच श्री गणेशमूर्ती विसर्जनावर फोडतात.

वारकर्‍यांच्या श्रद्धेशी खेळ !

आळंदी येथील इंद्रायणी नदी तर बहुतांश महिने जलपर्णीने वेढलेली असते, सातत्याने येणार्‍या पांढर्‍या फेसासह आजूबाजूच्या अनेक कारखान्यांमधून प्रक्रिया न करता मिसळणारे सांडपाणी तर आता नित्याचेच झाले आहे ! इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी अनेक बैठका झाल्या, घोषणा झाल्या; मात्र हे सगळे कागदावरच राहिले. वर्ष २०१७ मध्ये ‘नमामि चंद्रभागा’ची घोषणा झाली. अनुमाने ११० किलोमीटरचा परिसर त्यात समाविष्ट करण्यात आला. पुणे, सातारा, सोलापूर या संयुक्त जिल्ह्यांनी काम करायचे ठरले; मात्र इच्छाशक्तीच्या अभावामुळे पुढे काहीच घडले नाही. पंढरपूरच्या नदीच्या काठावर आता अतिक्रमणासह अवैध वाळूउपसा मोठ्या प्रमाणात होतो. याकडेही सातत्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पुण्यातील मुळा-मुठा नदीची इतकी वाईट अवस्था झाली आहे की, नदीचे पाणी काळेकुट्ट असून त्यात पाय बुडवण्यासही सर्वसामान्य माणूस धजावणार नाही. या सर्वांवर आता शासन आणि प्रशासन अशा दोन्ही स्तरांवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असून प्रत्यक्ष कृती केली, तरच या नद्या प्रदूषणातून मुक्त होतील.

संपादकीय भूमिका

  • राज्यातील महत्त्वाच्या नद्यांची विदारक स्थिती होण्यास उत्तरदायी कोण ? एरव्ही प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होऊ नये म्हणून हिंदूंना शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन आणि अन्य धार्मिक कृती करू न देणारे प्रशासन प्रदूषित झालेल्या नद्यांच्या स्थितीविषयी कुणाला शिक्षा करणार कि स्वत:ला शिक्षा करून घेणार ? नद्यांची ही दु:स्थिती अशीच ठेवल्यास जनभावनांचा उद्रेक होणार नाही कशावरून ?
  • नद्यांच्या या प्रदूषणाविषयी अंनिसवाले आणि कथित बुद्धीप्रामाण्यवादी काही बोलणार का ?