वर्ष १८५७ पासून १९४७ पर्यंत चालू राहिलेला क्रांतीयज्ञ !

१. भारतियांवर केलेल्या अत्याचाराचा सूड म्हणून क्रांतीकारक चापेकर बंधूंनी २ इंग्रज अधिकार्‍यांना गोळ्या घालून ठार मारणे : ‘२२.६.१८९७ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे अनुयायी असलेल्या कीर्तनकार क्रांतीकारक चापेकर बंधूंनी पुण्यातील गणेशखिंडीच्या रस्त्यावर ‘रॅन्ड’ आणि ‘आयर्स्ट’ या दोन इंग्रज अधिकार्‍यांना गोळ्या घालून ठार मारले. देशातील जनता प्लेग आणि दुष्काळ यांमुळे आधीच त्रस्त झाली होती. त्यातच प्लेग प्रतिबंधक उपायांच्या निमित्ताने ब्रिटीश अधिकारी आणि सोजीर (शिपाई) यांनी घराघरात घुसून भयानक बीभत्स अत्याचार केले. लोकांमधील असंतोषाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच ‘ब्रिटीश राणीच्या राज्यारोहणाची ‘डायमंड ज्युबिली’ (हिरक महोत्सव (६० वर्षे पूर्ण झाल्याचा)’ २२.६.१८९७ या दिवशी बळजोरीने साजरी करण्याचा कार्यक्रम योजिला आणि ‘अत्याचाराला प्रत्याचाराने प्रत्युत्तर देण्या’च्या क्रांतीकारकांच्या धोरणानुसार चापेकर बंधूंनी सूड घेतला. ते पसार झाले. नेहमीप्रमाणे मुंबईत कीर्तने करू लागले.

२. फितूर द्रविड बंधूंमुळे चापेकर बंधूंना अटक आणि त्यानंतर झालेली फाशी ! : परंतु ब्रिटिशांनी वधकांना पकडून देण्यासाठी लावलेल्या मोठ्या रोख रकमेच्या मोहाला फसून द्रविड बंधूंनी सप्टेंबर १८९७ मध्ये शासनाला चापेकर बंधूंची माहिती दिली. त्यानुसार प्रथम दामोदरपंत चापेकरांना अटक करण्यात आली. त्यांना १९.४.१८९८ या दिवशी फाशी दिली. फितूर द्रविड बंधूंना ब्रिटिशांनी ‘बक्षीस’ दिले आणि क्रांतीकारक वासुदेवराव चापेकर अन् महादेव रानडे यांनी ८.२.१८९९ या दिवशी रात्री द्रविड बंधूंना गोळ्या घालून ठार मारले. फितुरीला देहांत शासन दिले.

दुसर्‍याच दिवशी या क्रांतीकारकांना सहकार्‍यांसह अटक करण्यात आली. ८.५.१८९९ या दिवशी वासुदेवराव चापेकर, १०.५.१८९९ या दिवशी महादेव रानडे आणि १२.५.१८९९ या दिवशी बाळकृष्णपंत चापेकर यांना फाशी देण्यात आले.

३. क्रांतीकार्यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकर सिद्ध : या क्रांतीकार्यातूनच युवा विनायक दामोदर सावरकर यांनी ‘चापेकर बंधूंचे स्वदेश मुक्ती’चे कार्य पुढे चालवण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी आजीवन देशसेवेचे कार्यवाहीत आणलेले व्रत देशभक्त वाचकांना ठाऊकच आहे.

४. वर्ष १८५७ पासून १९४७ पर्यंत लढल्या गेलेल्या ‘क्रांती समरा’त फाशी गेलेले क्रांतीकारक ! : ब्रिटिशांच्या दास्यातून मुक्त होण्यासाठी वर्ष १८५७ मध्ये देशव्यापी ‘क्रांती समर’ लढले गेले. त्यात अपयश आले, तरी ते व्रत हुतात्मा आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी पुढे चालवले. क्रांतीचा हा यज्ञ वर्ष १९४७ पर्यंत चालूच राहिला. त्यात शेकडो लोक फाशी गेले !’

(साभार : मासिक ‘प्रज्वलंत’, २.१२.१९९४)