Bengal Assam Election : बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्याने बांगलादेश तणावात !

बांगलादेशातील पत्रकार अल्ताफ परवेज

ढाका (बांगलादेश) – बंगाल आणि आसाम येथे भाजपची सत्ता आल्यानंतर शेजारी असलेल्या बांगलादेशावर याचा काय परिणाम होणार ?, यावरून चर्चा चालू झाली आहे. बंगालमधील मतदानोत्तर चाचणीत ‘भाजपला सत्ता मिळणार’, असे सांगण्यात आल्यावर बांगलादेशातील संसदेत एक खासदाराने ‘बंगालमधून निर्वासित बांगलादेशात येऊ शकतात आणि त्यामुळे बांगलादेशासमोर एक नवे संकट निर्माण होऊ शकते’, अशी भीती व्यक्त केली होती. आता बांगलादेशातील पत्रकार अल्ताफ परवेज यांनीही यावर भाष्य केले आहे.

बांगलादेशी वृत्तपत्र ‘प्रथोमोलो’मध्ये परवेझ यांनी लिहिले आहे की, भारतीय जनता पक्षाला वर्ष २०११ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती; परंतु १५ वर्षांच्या आत त्यांनी २०० चा आकडा पार केला. दक्षिण आशियातील राजकीय वातावरणासाठी हे ‘राईट साईड शिफ्ट’चे (उजव्या विचारसरणीकडे झुकण्याचे) ऐतिहासिक चिन्ह आहे. बंगालच्या निवडणूक निकालांनी सीमापार बांगलादेशात अस्वस्थता निर्माण केली आहे. भारतातील अलीकडच्या वर्षांतील कोणत्याही निवडणुकीने बांगलादेशामध्ये इतकी खळबळ निर्माण केली नव्हती. बंगालच्या निवडणुकीने यापूर्वी कधीही अशा प्रकारे बांगलादेशाच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले नव्हते.

बांगलादेशाचे लक्ष का होते ?

अल्ताफ परवेज यांचे म्हणणे आहे की, बंगालमध्ये ‘बंगाली ओळखी’चे सूत्र राजकीयदृष्ट्या बाजूला पडणे आणि भाजप-तृणमूल काँग्रेस यांची रणनीती यावर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. या सूत्रावर वेगवेगळे दावे केले जात असले, तरी हे सत्य आहे की, या निवडणुकीच्या निकालांनी सीमापार बांगलादेशात अस्वस्थता निर्माण केली आहे. या अस्वस्थतेची अनेक कारणे आहेत. याचे एक कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला धडाकेबाज प्रचार, हे आहे.

बांगलादेश का चिंतेत आहे ?

बंगालच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या राजकीय वादळात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बांगलादेशाचा उल्लेख होत राहिला. अमित शहा यांच्या विधानांनी बांगलादेशातील अस्वस्थता अधिकच वाढवली; कारण ते केंद्र सरकारमधील एक शक्तीशाली मंत्री आहेत. अल्ताफ परवेज यांचा दावा आहे की, बंगालमधील भाजपच्या विजयाचे परिणाम भारताच्या सीमांच्या बाहेरही (बांगलादेशात) होतील. सखोल पुनरावलोकन प्रक्रियेच्या अंतर्गत मतदार सूचीतून वगळण्यात आलेल्या लाखो लोकांना सीमापार पाठवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. असेच विधान भाजपचा इतरही नेते सातत्याने करत आहेत. आता भाजप देहलीसमवेत बंगालमध्येही सत्तेत आहे.

(म्हणे) ‘घुसखोरांना हाकलल्यास दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव येईल !’

परवेज यांचा दावा आहे की, लोकांना सीमापार पाठवण्याच्या प्रयत्नांमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो. गेल्या काही आठवड्यांत दोन्ही देशांच्या संबंधांत झालेली सुधारणा पुन्हा अडचणीत येऊ शकते. ही परिस्थिती अनेक गुंतागुंतीचे राजनैतिक आणि मानवी प्रश्न उभे करेल. मोठ्या स्तरावर असे प्रयत्न होणार नाहीत, अशी शक्यता असली तरी, अशी कृती होणार असल्याचे नाकारता येत नाही.

अल्ताफ यांच्या म्हणण्यानुसार भाजप आसाम आणि बंगाल यांसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये भक्कम झाल्यामुळे बांगलादेशावर निश्चितपणे दीर्घकाळ दबाव राहील. भारताच्या नेत्यांकडून जर निवडणुकीनंतरही अशीच विधाने होत राहिली, तर येणार्‍या काळात बांगलादेशातही या सूत्रावर राजकीय हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे.