‘आम्हाला पैसे नको; पण अपघात का झाला आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का?’ याची माहिती द्या !

गेल्या वर्षी कर्णावती येथे झालेल्या विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे पंतप्रधानांना पत्र

कर्णावती (गुजरात) – आम्हाला पैसे नको आहेत. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, अपघात का झाला आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का? जर ‘ब्लॅक बॉक्स’ आणि ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ यांमधील डेटा सार्वजनिक केला जाऊ शकत नसेल, तर किमान तो खासगीरित्या कुटुंबांसमवेत सामायिक केला जावा, अशी मागणी १२ जून २०२५ या दिवशी कर्णावती येथे झालेल्या विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांनी पतंप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. ३० पीडित कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पीडित कुटुंबांनी पत्राची प्रत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाही पाठवली आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने गेल्या वर्षी जुलैमध्ये विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल यावर्षी जूनमध्ये, म्हणजेच अपघाताच्या पहिल्या वर्षपूर्तीजवळ येण्याची शक्यता आहे.

कर्णावती येथून लंडनला जाणारे बोइंग ७८७ हे विमान उड्डाणानंतर लगेचच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले होते. या अपघातात २४१ प्रवासी आणि इतर १९ लोकांसह एकूण १६० लोकांचा मृत्यू झाला होता. यात ६० परदेशी नागरिकही होते.