साधना करतांना अनावश्यक गोष्टी टाळण्याचे आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व !

‘सध्याच्या युगात अनेक साधक केवळ काही घंटे साधना म्हणून नामजप, ध्यान इत्यादी करतात आणि दिवसाचा बहुतांश वेळ दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट पहाण्यात, तसेच भ्रमणभाष अन् ‘सोशल मिडिया’ यांचा वापर करण्यात घालवतात.

श्री. निषाद देशमुख

संतांच्या सत्संगात असलेले चैतन्य आणि सात्त्विकता यांमुळे सत्संगातील व्यक्तीची आध्यात्मिक पातळी तात्कालिक कालावधीसाठी वाढते. त्यामुळे तिला आध्यात्मिक अनुभूती येते. व्यक्तीला सतत काही काळ संतांच्या सत्संगातील चैतन्य मिळाल्यामुळे आणि तिच्या साधनेच्या प्रयत्नांमुळे तिची आध्यात्मिक पातळी टिकून रहाते. याउलट रज-तमप्रधान चित्रपट आणि दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे, ‘सोशल मिडिया’चा वापर करणे इत्यादी गोष्टी करण्यात दिवसातील अधिकांश वेळ घालवल्यास व्यक्तीची आध्यात्मिक पातळी तात्कालिक कालावधीसाठी घटते. त्या वेळी साधकाच्या न्यून झालेल्या आध्यात्मिक पातळीचा अपलाभ घेऊन वाईट शक्ती साधकावर तीव्र आक्रमणे करतात आणि त्याला रुग्णाईत करतात. सतत काही काळ व्यक्तीवर वाईट शक्तीचे आक्रमण होणे आणि चित्रपट अन् दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे, ‘सोशल मीडिया’चा वापर करणे इत्यादींतून प्रक्षेपित होणारे रज-तम यांमुळे शेवटी व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीत नेहमीकरता घट होते.

‘असे होऊ नये’, यासाठी साधकाने दिवसभर प्रार्थना, येता-जाता नामजप आणि भावजागृतीचा प्रयोग करणे, तसेच कृतज्ञता व्यक्त करणे, अशा विविध माध्यमांतून ईश्वराच्या सत्संगात, म्हणजे अनुसंधानात असणे महत्त्वपूर्ण आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.१.२०२६, वेळ : सकाळी १०.०२ वाजता आणि कालावधी : १० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला  त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर,  राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत  सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक