(म्हणे) ‘आम्ही प्रतिस्पर्धी नाही, भागीदार !’ – Chinese Foreign Minister Wang Yi

  • भारतासमवेतच्या संबंधांवर चीनचा पालटलेला सूर

  • संघर्षामुळे आशियाची हानी होत असल्याचाही केला दावा

वांग यी

बीजिंग (चीन) – भारत आणि चीन यांनी ‘शेजारी देश’ म्हणून मैत्री जपली पाहिजे आणि सीमाभागांत शांतता अन् स्थिरता सुनिश्चित केली पाहिजे. तसेच दोन्ही देशांनी विकास आणि सहकार्य यांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारत आणि चीन हे ‘ग्लोबल साऊथ’चे (युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडांबाहेरील विकसनशील देशांच्या समूहाचे) महत्त्वाचे देश असून दोघांमध्ये सखोल ऐतिहासिक अन् सांस्कृतिक संबंध आहेत. परस्पर विश्वास आणि सहकार्य यांमुळे दोन्ही देशांच्या विकासाला गती मिळू शकते, तर संघर्ष आशियाच्या विकासासाठी हानीकारक ठरेल, असे विधान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केले. ते चीनच्या संसदेच्या सत्रापूर्वी आयोजिक वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. या वर्षी भारत ‘ब्रिक्स’चे (ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचा समूह. आता इजिप्त, इथिओपिया, इराण,  संयुक्त अरब अमिराती हे देश समाविष्ट झाले आहेत.) यजमानपद भूषवणार आहे, तर वर्ष २०२७ मध्ये चीन या परिषदेचे यजमानपद भूषवेल.

वांग यी पुढे म्हणाले की, वर्ष २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या बैठकीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना नवीन प्रारंभ झाला, त्यानंतर टियानजिनमधील चर्चेने संबंध अधिक सुधारण्यास साहाय्य केले. अलीकडच्या काळात दोन्ही देशांमधील राजनैतिक संवाद, व्यापार आणि लोकांमधील संपर्क वाढला आहे. द्विपक्षीय व्यापाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला असून याचा दोन्ही देशांतील जनतेला प्रत्यक्ष लाभ झाला आहे. दोन्ही देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या आयोजनात एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे.

लडाखमधील डोकलाम येथे झालेल्या सैनिकी संघर्षानंतर भारत-चीन संबंध सुमारे ५ वर्षे थंडावले होते; मात्र २०२४ मध्ये कझान येथे पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर संबंध सामान्य करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली.

संपादकीय भूमिका  

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करून भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी बळकावणार्‍या चीनवर कोण विश्वास ठेवणार ? चीनने प्रथम तो भागीदार आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि मग बोलावे !