‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानच्या अणू प्रकल्पाला लक्ष्य केले होते ! – Tom Cooper

जगप्रसिद्ध विमानन तज्ञ आणि संरक्षण विश्लेषक टॉम कूपर यांचा दावा

टॉम कूपर (छायाचित्र सौजन्य : ANI)

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानातील किराना हिल्स येथे असलेल्या अणू प्रकल्पाला लक्ष्य केले होते, असा दावा जगप्रसिद्ध विमान तज्ञ आणि संरक्षण विश्लेषक टॉम कूपर यांनी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यासंदर्भात त्यांच्या जवळ अनेक पुरावे आहेत.

१.  कूपर यांनी सांगितले की, आक्रमणाची वेळ आणि पद्धत पहाता तो ठाम धोरणात्मक संदेश देण्यासाठी करण्यात आला होता. अधिक विध्वंस न घडवता स्पष्ट चेतावणी द्यायची असेल, तर अशा ठिकाणी प्रहार केला जातो. ‘पाकिस्तानमधील लोकांनो, आम्ही हवे तेव्हा, हवे त्या ठिकाणी, हवे तितक्या शस्त्रास्त्रांसह तुमच्यावर तीव्र आक्रमण करू शकतो’, असा संदेश यातून देण्यात आला होता.

२. पुराव्यांविषयी कूपर यांनी सांगितले की, त्यांच्या जवळ अनेक पुरावे आहेत. त्यात अशा चित्रफितींचाही समावेश आहे, ज्यात क्षेपणास्त्रांच्या धुराचे निशाण डोंगरावर उतरतांना दिसतात. त्यांनी पाकिस्तान वायू दलाच्या ४०९१ व्या स्क्वॉड्रनच्या (तुकडीच्या) रडार स्थानकातून उठणार्‍या धुराकडेही लक्ष वेधले.

३. कूपर म्हणाले की, पुरावे इतके स्पष्ट आहेत की, भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेला निष्प्रभ करण्यासाठी सर्वप्रथम या रडार स्थानकांवर आक्रमण केले आणि त्यानंतर भूमिगत साठवण सुविधांच्या किमान २ प्रवेशद्वारांना लक्ष्य केले.

४. कूपर यांच्या मते, किराना हिल्स हे पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. तेथे सुमारे २० ते २४ गौण अणू चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे काही करमणुकीचे उद्यान नाही.

५. भारतीय वायूदलाने त्या ठिकाणी आक्रमण केल्याचे नाकारण्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या म्हणण्यानुसार आक्रमण झाल्याचे इतके स्पष्ट असतांना त्याला फेटाळण्यात का येत आहे, हे समजत नाही. ही गोष्ट नाकारणे म्हणजे जणू सूर्य पूर्वेकडून उगवत नाही, असे म्हणण्यासारखे आहे. हे कुणाला पटेल ?