Hindu Raksha Dal : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु रक्षा दलाने चौथ्या अपत्यावर हिंदु दांपत्याला दिले २१ सहस्र रुपये

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदूंची लोकसंख्या वाढ आणि सामाजिक संतुलनाचा कार्यक्रम पुढे नेण्याच्या उद्देशाने हिंदु रक्षा दलाने त्याच्या घोषणेच्या कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पिंकी चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एका दांपत्याने चौथे अपत्य जन्माला घातल्यानंतर एका हिंदु दांपत्याला २१ सहस्र रुपयांची प्रोत्साहन रक्कम प्रदान केली.

‘हिंदु समाजातील लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी हिंदु रक्षा दल आर्थिक साहाय्य देईल’, अशी घोषणा श्री. पिंकी चौधरी यांनी केली होती. देहलीतील गगन विहार परिसरातील मनोज आणि पुष्पा या दांपत्याला ६ फेब्रुवारी या दिवशी मुलगी झाली. ही माहिती मिळताच श्री. पिंकी चौधरी यांनी दांपत्याची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन म्हणून २१ सहस्र रुपयांची रक्कम दिली.

पाचव्या अपत्यावर ३१ सहस्र रुपयांचे साहाय्य देणार

संघटनेची भूमिका स्पष्ट करतांना श्री. पिंकी चौधरी यांनी ‘हा उपक्रम एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. कोणतेही हिंदु कुटुंब पाचव्या अपत्यास जन्म देईल, तर संघटनेकडून त्याला ३१ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाईल. हिंदु कुटुंबांनी हिंदूंची लोकसंख्या टिकवण्यासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक आहे. सनातन कुटुंबे वाढली, तरच देश सुरक्षित राहील, असे त्यांनी नमूद केले.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांसमोर निभाव लागायचा असेल, तर हिंदूंचीही लोकसंख्या वाढायला हवी, असे काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांना वाटते; मात्र त्यांच्यासमोर निभाव लागण्यासाठी संख्याबळ नव्हे, तर आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे !
  • पांडव पाच होते, तर कौरव शंभर होते, तरीही कौरवांचा पराभव झाला आणि पांडव विजयी झाले; कारण त्यांच्यासोबत श्रीकृष्ण होता. त्यामुळे धर्मांधांमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या निवारणासाठी साधना आवश्यक आहे !