T20 World Cup : १५ फेब्रुवारीला पाकिस्तान भारताविरुद्ध खेळणार क्रिकेट सामना !

बांगलादेशाच्या मध्यस्थीनंतर निर्णय

ढाका (बांगलादेश) – सध्या चालू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतर्गत १५ फेब्रुवारीला होणार्‍या भारताच्या विरोधातील सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला होता. यावर आता बांगलादेश क्रिकेट मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांच्या मध्यस्थीने पाकने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने ही माहिती दिली असून पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी यांची पाठराखण केली आहे. बांगलादेश मंडळाने म्हटले की, नक्वी यांनी ‘अनुकरणीय क्रीडाभावना आणि एकता’ यांचे दर्शन घडवले.

बांगलादेशाने भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेकडे संपूर्ण पाठ फिरवल्यानंतर पाकने बांगलादेशाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यानेही स्पर्धेतील केवळ भारतीय क्रिकेट संघासमवेत सामना न खेळण्याचे स्पष्ट केले होते. यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकला चेतावणी दिली होती. त्यावर बांगलादेशाने मध्यस्थी करून पाकची भारतासमवेत सामना खेळण्याची मनधरणी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशाच्या केलेल्या लाळघोटेपणामागील ‘अर्थ’गणित !

मुळात बांगलादेशाने संपूर्ण स्पर्धेवरच बहिष्कार टाकला आहे. त्याला पाकने नाटकीय रूप दिले एवढेच. आता पाक भारतासमवेत खेळणार असला, तरी बांगलादेशावर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणतीही कारवाई केलेली नाही. याउलट त्याला ‘वर्ष २०३१ च्या आधी भविष्यातील जागतिक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषणवण्याची संधी देऊ’, अशा प्रकारे लाळघोटेपणा चालवला आहे. या विचित्र प्रतिसादावर अनेकांनी विरोध दर्शवला आहे.

लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट मंडळांचे अधिकारी आणि ‘आयसीसी’चे अधिकारी यांच्यात बैठक झाली. तेव्हा बांगलादेशाने एकप्रकारे आयसीसीच्या लाचारीचा अपलाभ उठवला. ‘आयसीसी’साठी भारत-पाकिस्तान सामना सर्वांत आवश्यक असतो. याचे कारण सामन्यामागे दडलेले अर्थकारण. बांगलादेशाने पाकला सामना खेळण्यासाठी तयार करून ‘आयसीसी’च्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता केली. त्या बदल्यात ‘आयसीसीने बांगलादेशावर कोणतीही कारवाई करू नये’, असा अप्रत्यक्ष दबाव आणला. ‘आयसीसी’ने बांगलादेशातील २० कोटी क्रिकेटप्रेमींच्या भावनांचा विचार करून, म्हणजेच बांगलादेश क्रिकेटच्या अर्थकारणाचा विचार करून स्वत:च्या नियमांनाच बगल दिली.

संपादकीय भूमिका

खरेतर पाकने भारतासमवेत सामना न खेळण्याचे घोषित करण्याआधीच भारताने पाकवर बहिष्कार टाकायला हवा होता. पहलगाम आक्रमणानंतरही भारत पाकला पायघड्या घालतो, याचा अर्थ त्याला बांगलादेशातील सोडाच, पण भारतातील हिंदूंच्या प्राणांचेही कोणतेच मूल्य नाही, हेच लक्षात येते !