‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश : एस्.टी.ची राज्यभर ‘डीप क्लीनिंग’ (सखोल स्वच्छता) मोहीम !

एस्.टी.च्या मृतावस्थेतील ‘हेल्पलाईन’ला उर्जितावस्था देण्याची सुराज्य अभियानाची मागणी !

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी राज्यभरात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या अभियानाची नोंद घेत राज्य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान चालू केले. तसेच बसस्थानकाची स्वच्छता नियमित होण्यासाठी डेपो व्यवस्थापकांना प्रत्येकी १५ दिवसांनी स्थानकांची ‘डीप क्लिनिंग’ (सखोल स्वच्छता) करण्याचे आदेश दिले.

या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; मात्र बसस्थानकांचा परिसर चकाचक होत असला, तरी प्रवाशांसाठीची संपर्क यंत्रणा आजही मृतावस्थेत आहे. त्यामुळे ‘१५ दिवसांनी होणार्‍या स्वच्छता मोहिमेत केवळ फरशी न पुसता राज्यभरातील बंद पडलेली संपर्क यंत्रणा (हेल्पलाईन) चालू करून तिलाही उर्जितावस्था द्यावी’, अशी आग्रही मागणी सुराज्य अभियानाने केली आहे.

बसस्थानकांवर चौकशी खिडकीवरील दूरभाषही उचलण्याची व्यवस्था करा ! – सुराज्य अभियान

पलूस (जिल्हा सांगली) येथील आगाराचे व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळी (सर्वांत उजवीकडे) यांना सुराज्य अभियानाचे निवेदन देतांना जागरूक नागरिक

सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी एका महत्त्वाच्या सूत्रावर लक्ष वेधले. ते म्हणाले की, एस्.टी. प्रशासनाने स्वच्छतेविषयी सकारात्मक पाऊल उचलले हे स्वागतार्ह असले, तरी ‘सुराज्य अभियाना’ने एका गंभीर विसंगतीकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनेक बसस्थानकांवर चौकशी खिडकीवरील दूरभाष उचलले जात नाहीत किंवा ते बंद असतात. प्रवाशांना गाड्यांच्या वेळा, पालट किंवा तक्रारींसाठी संपर्क साधायचा झाल्यास त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे आगार व्यवस्थापक श्री. दिलीप ठोंबरे यांना सुराज्य अभियानाचे निवेदन देतांना जागरूक नागरिक

ते पुढे म्हणाले की, राज्यभरातून येणार्‍या तक्रारींची नोंद घेत अभियानाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांतील २१ आगार व्यवस्थापकांना यासंदर्भात निवेदने दिली. अभियानाने पाठवलेल्या ईमेलची गंभीर नोंद घेत मुख्यमंत्री सचिवालय आणि एस्.टी. प्रशासन यांनी राज्यातील ३१ विभागांना तातडीने त्रुटी सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रवाशांना जर एस्.टी.शी संपर्कच साधता येत नसेल, तर त्या सौंदर्यीकरणाचा उपयोग काय ?

मुरुकटे पुढे म्हणाले की, प्रशासनाने आमच्या निवेदनाची नोंद घेऊन ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान चालू केले, ही स्वागतार्ह गोष्ट आहे; मात्र सक्रीय हेल्पलाईनविना ही मोहीम अपूर्ण आहे. प्रवाशांना जर एस्.टी.शी संपर्कच साधता येत नसेल, तर त्या सौंदर्यीकरणाचा उपयोग काय ? त्यामुळे १५ दिवसांनी होणार्‍या स्वच्छता मोहिमेत ‘संपर्क यंत्रणेची चाचपणी’ हा नियमच करावा. सेवा लेखापरीक्षणात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकार्‍यांच्या सेवा पुस्तिकेत ‘नकारात्मक नोंद’ करण्यात यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.