ICC Denied VISA : भारतीय आयसीसी अधिकार्‍याला बांगलादेशाने व्हिसा नाकारला !

टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेशी क्रिकेट संघाने भारतात खेळण्यास नकार दिल्याचे प्रकरण

(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र)

नवी देहली – पुढील महिन्यात, म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून टी२० विश्वचषक स्पर्धेला आरंभ होणार आहे; मात्र बांगलादेशाचा संघ भारतात येणार कि नाही ?, याविषयी अद्याप अनिश्चितता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’ अर्थात् ‘आयसीसी’चे २ सदस्यांचे पथक ढाका येथे जाणार होते; मात्र माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशाने या पथकातून भारतीय वंशाच्या आयसीसी अधिकार्‍याला व्हिसा नाकारला आहे.

१. बांगलादेश क्रिकेट मंडळाशी चर्चा करण्यासाठी जाणार्‍या आयसीसीच्या २ अधिकार्‍यांपैकी एक अधिकारी भारतीय वंशाचे अधिकारी होते. त्यांच्यासमवेत आयसीसीचा भ्रष्टाचारविरोधी विभाग आणि सुरक्षा प्रमुख असलेले अँड्र्यू एफग्रेव हेही जाणार होते.

२. बांगलादेशातील ‘बीडी न्यूज २४’ ने दिलेल्या वृत्तानुसार एफग्रेव एकटेच ढाका येथे पोचले. बांगलादेशकडून भारतीय वंशाच्या आयसीसी अधिकार्‍याला व्हिसा न दिल्यामुळे आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार आयसीसीकडून केवळ एकच सदस्य ढाका येथे पोचू शकला.

टी २० विश्वचषकातील वादाची पार्श्वभूमी

बांगलादेशातील वाढत्या भारतविरोधी कारवाया पहाता भारतात एप्रिल महिन्यामध्ये होणार्‍या ‘इंडियन प्रिमियर लिग’ अर्थात् ‘आय.पी.एल्.’मध्ये बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्ताफिजुर रहमान याला खेळू न देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला होता. यावर बांगलादेशाच्या क्रिकेट मंडळाने आक्षेप घेतला होता. टी२० विश्वचषकात बांगलादेशाला भारतात ४ साखळी सामने खेळायचे आहेत; मात्र सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशाने आयसीसीकडे मागणी केली आहे की, हे सामने या स्पर्धेचा संयुक्त यजमान श्रीलंकेत घेण्यात यावेत. स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून चालू होणार असल्याने ‘आयसीसी’चे अधिकारी बांगलादेश क्रिकेट मंडळाशी चर्चा करून भारतात खेळण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेश सातत्याने भारतविरोधी कारवाया करून भारतद्वेष प्रकट करत असतो. असे असतांनाही भारत मात्र सौम्य भूमिका घेत आहे. बांगलादेशातला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
  • मुळात बांगलादेशी क्रिकेट संघाला भारतात का खेळू द्यायचे ? वास्तविक ‘भारतीय क्रिकट नियामक मंडळा’ने बांगलादेशी संघाला भारतात खेळवू नये, असे ठणकावून सांगणे अपेक्षित होते; मात्र या मंडळाला भारतीय अस्मितेशी काहीही देणेघेणे नसल्याने बांगलादेश अशा प्रकारे भारताचा अवमान करू धजावत आहे !