Shaksgam Valley Row : शक्सगाम खोर्‍यावरील पाकिस्तान-चीन करार बेकायदेशीर ! – भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

  • चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या विरोधात आता भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही केले विधान

  • परराष्ट्र मंत्रालयानेही दर्शवला होता विरोध

नवी देहली – भारत शक्सगाम खोर्‍यावरील पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वर्ष १९६३ च्या कराराला अवैध मानतो. तेथे चालू असलेल्या चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या कामाला आम्ही मान्यता देत नाही, असे वक्तव्य सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले. ४ दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हीच भूमिका घेतली होती. जनरल द्विवेदी यांनी म्हटले की, आम्ही या कृत्याला दोन्ही देशांनी केलेली एक अवैध कारवाई मानतो.

यापूर्वी लडाखचे उपराज्यपाल कवींद्र गुप्ता यांनीही चीनने शक्सगाम खोर्‍यावर केलेला दावा कठोरपणे फेटाळला होता. ते म्हणाले की, पाकच्या कह्यात असलेले काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकने चीनसमवेत काय करार केला आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. चीनने हे समजून घेतले पाहिजे की, त्याच्या विस्तारवादी धोरणातून काहीही साध्य होणार नाही. भारत आता वर्ष १९६२ चा नाही, हा २०२६ चा भारत आहे. अशा कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडले जाईल.

शक्सगाम खोर्‍याचे सामरिक महत्त्व !

शक्सगाम खोरे जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील भागात आहे. हा प्रदेश काराकोरम पर्वतरांगेत येतो आणि सियाचीनच्या ईशान्येस आहे. हा भारताचा भाग असला, तरी वर्ष १९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून काढून पाकने तो चीनला दिला होता. भारताने हा करार अवैध ठरवला होता; कारण हा प्रदेश भारताच्या जम्मू-काश्मीरचा भाग आहे. हा प्रदेश भारत-चीन-पाकिस्तान त्रिकोणीय सीमेजवळ आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या अंतर्गत शक्सगाम खोर्‍यात चीन मोठ्या प्रमाणावर बांधकाम करत आहे. चीन येथे सर्व-हंगामी रस्ता (ऑलवेदर रोड) बांधत आहे, ज्यातील अनुमाने ७५ किमी लांबी आणि १० मीटर रुंदीचा रस्ता आधीच पूर्ण झाला आहे.

संपादकीय भूमिका

भारताकडून अशा प्रकारे वारंवार वक्तव्ये येऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष भूमीवर यत्किंचितही परिणाम होणार नाही, हेच सत्य आहे. आपल्याला निर्णायक कृती करणे हीच काळाची आवश्यकता आहे, हे भारत केव्हा लक्षात घेणार ?