‘एपस्टीन फाइल्स (धारिका)’ उघड झाल्या ‘काँग्रेस आणि तिचे नेते यांनी केलेल्या कारनाम्यांच्या फाइल्स’ कधी उघड करणार ?

पाश्चात्त्य देशांमध्ये मुली, महिला आणि अल्पवयीन मुले यांच्या लैंगिक शोषणाच्या घटना दर काही दिवसांनी उघड होतात. यातून चर्च संस्थाही सुटलेली नाही. अमेरिकी सरकारने नुकत्याच सार्वजनिक केलेल्या ‘एपस्टीन फाईल्स’च्या धारिकांमधून अमेरिकेत धनाढ्य गुन्हेगार कशा प्रकारे अल्पवयीन मुली, महिला यांच्या लैंगिक शोषणाची यंत्रणा निर्माण करतो ? त्यांची तस्करी लोकप्रतिनिधी, श्रीमंत उद्योगपती आणि समाजातील प्रतिष्ठित यांना सहभागी करून घेतो, मुलींना लैंगिक गुलाम बनवून त्यांची तस्करी करतो, ही सर्व भयावह स्थिती उघड करण्यात आली आहे.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांत आपण ‘जेफ्री एपस्टीन प्रकरणाची व्याप्ती, या प्रकरणाला प्रारंभ कधी आणि कुठे झाला ? जेफ्री एपस्टीन याची पार्श्वभूमी, नवीन प्रकाशित झालेली कागदपत्रे, गिस्लेन मॅक्सवेल हिची काळी कृत्ये आणि ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याविषयीचा उल्लेख’, यांविषयीची सूत्रे पाहिली. आज या लेखाचा अंतिम भाग पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993949.html

१४. काँग्रेसच्या नेत्यांच्या काळ्या कृत्यांची प्रकरणे

श्री. यज्ञेश सावंत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एपस्टीन प्रकरणामुळे भारतात हादरे बसतील, पंतप्रधान पालटतील’, अशी विधाने केली. त्यांच्याच काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या खालील प्रकरणांविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ?

अ. ऐतिहासिक ‘अजमेर सेक्स स्कँडल’ (वर्ष १९९२) : या प्रकरणात युवा काँग्रेसच्या काही नेत्यांचा समावेश होता, ज्यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले होते.

आ. पंडित सकपाळे (वर्ष १९९४) : जळगाव ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणात काँग्रेसशी संबंधित पंडित सकपाळे यांना शिक्षा झाली होती.

इ. एन्.डी. तिवारी यांचे ‘राजभवन प्रकरण’ (वर्ष २००९) : आंध्रप्रदेशाचे तत्कालीन राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन्.डी. तिवारी यांचा ३ महिलांससह असलेला व्हिडिओ एका तेलुगु वृत्तवाहिनीने ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये (छुप्या पद्धतीने केलेली मोहिम) प्रसारित केला होता.

या प्रकरणामुळे तिवारी यांना राज्यपाल पदाचे त्यागपत्र द्यावे लागले, तसेच त्यांच्यावर पितृत्वाचा दावासुद्धा झाला होता, जो ‘डी.एन्.ए.’ (अनुवांशिकता) चाचणीनंतर सिद्ध झाला.

ई. भंवरीदेवी प्रकरण – महिपाल मदेरणा (वर्ष २०११) : राजस्थानमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले महिपाल मदेरणा यांचे नाव भंवरीदेवी या परिचारिकेच्या बेपत्ता होण्याशी आणि तिच्या हत्येशी जोडले गेले होते. या प्रकरणात एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता, ज्याचा वापर करून भंवरीदेवी या मदेरणा यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप होता. मदेरणा यांना अटक करण्यात आली आणि त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले.

उ. अभिषेक मनु सिंघवी व्हिडिओ प्रकरण (वर्ष २०१२) : काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते आणि ज्येष्ठ अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, ज्यामध्ये ते एका महिलेसह आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसले होते. सिंघवी यांनी हा व्हिडिओ खोटे असल्याचे सांगून स्वत:च्या पदाचे त्यागपत्र दिले. न्यायालयाने या प्रकरणातील कायदेशीर तक्रार मिटवली होती.

ऊ. व्ही.एस्. चंद्रशेखरन (वर्ष २०२४) : केरळमधील ‘लॉयर्स काँग्रेस’चे अध्यक्ष व्ही.एस्. चंद्रशेखरन यांच्यावर एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केले होते. यामुळे त्यांनी वर्ष २०२४ मध्ये त्यागपत्र दिले. तथापि सप्टेंबर २०२५ मध्ये पुराव्यांच्या अभावी अन्वेषण पथकाने त्यांच्यावरील आरोप मागे घेण्याची विनंती न्यायालयात केली.

ए. राहुल मामकुटाथिल (वर्ष २०२५) : केरळमधील काँग्रेसचे आमदार राहुल मामकुटाथिल यांच्यावर वर्ष २०२५ मध्ये लैंगिक छळाचे आरोप झाले, ज्यामुळे पक्षाने त्यांना ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू यांच्यावरही अनेक वेळा मुली-महिला यांच्या शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्याविषयीचे सत्य जनतेला कळले पाहिजे. वर उल्लेख केलेल्या अनेक प्रकरणांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप फेटाळले असून काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा पुराव्याअभावी बंद करण्यात आली आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा गूढ मृत्यू !

देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी कुणालाही न जमलेले कार्य करणारे, म्हणजे सशस्त्र सैन्य सिद्ध करून ब्रिटिशांवर आक्रमण करणारे आणि खरेतर ज्यांच्या धाकामुळेच ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला, त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी काँग्रेस आणि ब्रिटीश यांच्यात काय करार झाला होता ?नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला कि अन्य काही होते ? असेही म्हटले जाते की, नेताजी सुभाषचंद्र बोस जरी स्वतंत्र भारतात सापडले असते, तरी त्यांना ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्याविषयी काँग्रेसने गुप्त करार केला होता. तो करार नेमका काय आहे ? आणखी कोणकोणत्या क्रांतीकारकांना अशा गुप्त करारांच्या पद्धतीने ब्रिटिशांच्या स्वाधीन केले जाणार होते ? यासंबंधीच्या धारिका भारतात सार्वजनिक व्हायला हव्यात.  – श्री. यज्ञेश सावंत

१५. राष्ट्रहितासाठी या सर्व ‘फाइल्स’ उघडणार का ?

अमेरिकेने ‘एपस्टीन फाइल्स ॲक्ट’ सिद्ध करून या प्रकरणातील लाखो पानांची कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. त्यामध्ये खरेतर जगातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांची नावे  आणि छायाचित्रे यांचा समावेश होता, तरीही या प्रकरणात पारदर्शकता रहाण्यासाठी अमेरिकेच्या न्यायालयाने जनतेपुढे सर्व माहिती खुली केली आहे. या धारिका धक्कादायक आहेतच; मात्र भारतात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, ज्यांच्या धारिका गोपनीयतेच्या नावाखाली जनतेपासून लपवण्यात आल्या आहेत. ही प्रकरणे मोठी आणि थेट देशाची प्रतिष्ठा, मान-सन्मान यांच्याशी संबंधित आहेत. ही गोपनीय कागदपत्रे उघड करण्याविषयी कायदा संमत करून अनेक धारिका जनतेसमोर आणाव्यात. त्यातून सत्य काय आहे ? ते भारतियांना निश्चितच समजेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर

अ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी धारिका : प्रखर देशप्रेमी, देशासाठी सर्वस्वाचा त्याग केलेले आणि ‘राष्ट्रनायक’ म्हणून कर्तृत्व असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेसने स्वतंत्र भारतात कशा प्रकारे छळ केला ? गांधी हत्येशी काहीही संबंध नसतांना त्यांना कारागृहात का ठेवले ? त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसे कुणी नेमली ? त्यांना नजरकैदेत, स्थानबद्धतेत का आणि कुणी ठेवले ? यांसह अनेक अशा गोष्टी असतील की, ज्यामुळे काँग्रेसने त्यांना सापत्न वागणूक दिली, हे जनतेला समजले पाहिजे.

डॉ. होमी भाभा

आ. डॉ. होमी भाभा (वर्ष १९६६) : भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा मृत्यू माऊंट ब्लँक (स्वित्झर्लंड) येथे विमान अपघातात झाल्याचे सांगितले जाते. भारताला अण्वस्रसज्ज होण्यापासून रोखण्यासाठी परदेशी गुप्तहेर संघटनेने (उदा. अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने) हा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जातो. डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूमागे कोण होते ? कुणाच्या सांगण्यावरून हा घातपात करण्यात आला ?

लालबहादूर शास्त्री यांचा रशियातील ताश्कंद

इ. ‘ताश्कंद करारा’ची धारिका : भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा रशियातील ताश्कंद येथे गूढ मृत्यू झाला. त्या वेळी त्यांचे शरीर काळेनिळे पडणे, नैसर्गिक मृत्यूच्या विपरीत गोष्टी घडणे, मृतदेहाचे शवविच्छेदन न केले जाणे, अशा गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे ही हत्या होती, असेच भारतीय जनतेला वाटते. ते ज्या व्हिलामध्ये थांबले होते, तिथे त्यांच्या खोलीत टेलिफोन किंवा अलार्मची सुविधा का नव्हती ? वर्ष १९७७ मध्ये नेमलेल्या ‘राज नारायण समिती’समोर साक्ष देण्यासाठी जाणारे शास्त्रीजींचे वैयक्तिक डॉक्टर आर्.एन्. चुघ आणि त्यांचे सेवक राम नाथ यांचा अपघातात मृत्यू कसा झाला ? या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी ‘राज नारायण समिती’ नेमण्यात आली होती; परंतु या समितीचा अहवाल कधीही सार्वजनिक करण्यात आला नाही किंवा तो गहाळ झाल्याचे म्हटले जाते. ही सर्व माहिती खुली होणे आवश्यक आहे.

इंदिरा गांधी

ई. आणीबाणीची धारिका : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षासह त्यांना होणारा विरोध दडपून टाकण्यासाठी वर्ष १९७५ मध्ये अचानक आणीबाणी लादून विरोधी पक्षातील सर्व नेते आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांची धरपकड केली, कारागृहात डांबले, त्यांचा अनन्वित छळ केला. यामागील नेमकी कारणे काय होती ? काय परिस्थिती नेमकी निर्माण झाली होती ? आणीबाणीच्या कालावधीत इंदिरा गांधी यांनी नेमक्या कोणत्या कारवाया केल्या ? कोणत्या कलमांखाली आणि कशा प्रकारे बळजोरी करून राज्यघटनेतील ४२ वी दुरुस्ती, म्हणजेच ‘धर्मनिरपेक्ष’ अन् ‘समाजवादी’ या शब्दांना घुसडले. या सर्वांची माहिती जनतेला होणे आवश्यक आहे.

उ. भारतातील धर्मांतराची धारिका : भारतातील ईशान्येकडील मेघालयसारखी राज्ये ख्रिस्तीबहुल कशी झाली ? भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियाच्या गुप्तहेर संघटनेसमवेत नेमके कोणते करार आणि का केले ? ज्यामुळे ईशान्य भारतात पद्धतशीरपणे धर्मांतर झाले आणि उर्वरित भारताला त्याविषयी काही कळलेही नाही.

वरील सर्व प्रकरणे ही काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेली आहेत. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सत्ता हाती घेतल्यानंतर देशाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आणि अशा अनेक प्रकरणांमागील सत्य भारतीय जनतेपर्यंत कधी आलेच नाही. गोपनीयतेच्या नावाखाली काँग्रेसने पापही केले आणि ते पद्धतशीरपणे झाकलेही ! त्यामुळे सध्या सत्तेत असणार्‍या शासनकर्त्यांनी देशाशी निगडित वरील आणि अन्य सर्व प्रकरणांच्या धारिका सार्वजनिक कराव्यात, तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी स्वपक्षाच्या काळ्या कृत्यांच्या धारिका खुल्या करण्याचे आवाहन करावे, ही अपेक्षा !

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल (३०.१२.२०२५)

संपादकीय भूमिका : केंद्र सरकारने भारताला विनाशाकडे ढकलणार्‍या काँग्रेसच्या काळ्या कृत्यांची पोलखोल करून तिच्या ऐतिहासिक कृत्यांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे !