Indore Contaminated Water :  इंदूर (मध्यप्रदेश) येथे दूषित पाण्यामुळे आतापर्यंत १४ जणांना मृत्यू

  • १६२ जण रुग्णालयात भरती

  • २ अधिकारी निलंबित

  • जलवाहिनीला गळती लागूत त्यात सांडपाणी मिसळल्याने पाणी दूषित

इंदूर (मध्यप्रदेश) : शहरातील भागीरथपुरामध्ये दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या दूषित पाण्यामुळे बाधित झालेले १६२ लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी इंदूरमध्ये जाऊन वेगवेगळ्या रुग्णालयांना भेट देऊन आजारी लोकांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली.

मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले,

‘‘अशी त्रासदायक परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होऊ नये. तुम्ही सर्वांनी यासाठी व्यापक नियोजन करावे. दूषित पाण्याच्या संदर्भात अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.’’ पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे त्यात सांडपाणी मिसळले. हे दूषित पाणी प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत २ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

मंत्री कैलाश विजयवर्गीय यांची असंवेदनशीलता !

मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत सहभागी होऊन मंत्री कैलाश विजयवर्गीय बाहेर आले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना उपचारात खर्च झालेल्या पैशांचा परतावा न मिळाल्याबद्दल विजयवर्गीय म्हणाले, ‘अरे सोडा यार…तुम्ही फुकट प्रश्न विचारू नका.’ यावर पत्रकार म्हणाले की, ‘हा फुकट प्रश्न नाही. आम्ही तिथे जाऊन आलो आहोत.’ यावर उत्तर देतांना मंत्री विजयवर्गीय यांनी चिडून अपशब्द वापरले. या नंतर काही वेळाने त्यांनी ‘एक्स’वरून खेद व्यक्त केला.

असंवेदनशील मंत्री कैलाश विजयवर्गीय

काँग्रेसने विजयवर्गीय यांचे त्यागपत्र मागितले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी एक्सवर मुख्यमंत्र्यांना उद्येशून म्हटले की, मुख्यमंत्री यादवजी, तुमचे सरकार आणि तुमचे मंत्री हा काय तमाशा करत आहेत ? पीडितांना विनामूल्य उपचार मिळत नाहीत, सहानुभूतीही मिळत नाही, वरून तुमचे अहंकारी मंत्री अपशब्दांचा वापर करत आहेत. थोडी जरी लाज शेष असेल, तर अशा उद्धट मंत्र्यांकडून नैतिकतेच्या आधारावर तात्काळ त्यागपत्र घ्या.

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागितला

भागीरथपुरात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी एक इंदूर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष रितेश इंसानी यांनी, तर दुसरी भागीरथपुरा येथील रहिवासी राहुल गायकवाड यांनी प्रविष्ट केली आहे. यावर सुनावणी करून न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल २ जानेवारीला सविस्तर सादर करण्याचा आदेश दिला.

संपादकीय भूमिका

जनतेच्या जिवाशी खेळणारे जनताद्रोही प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्‍या सर्व उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !