बांगलादेश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !

८ लाख ७० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज

नवी देहली : १०४.४८ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली बांगलादेशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे. राजकीय अस्थिरता आणि वाढती हिंसा यांमुळे देश दिवाळखोरीच्या दारात उभा आहे. महसुलात घट आणि गुंतवणूक अल्प झाल्याने सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. अनेक उद्योग आस्थापने बांगलादेशामधून बाहेर पडत आहेत. कर्जवाढ सुमारे १४ टक्क्यांच्या वेगाने होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. अशा अवस्थेत असलेला बांगलादेश भारताच्या विरोधात कठोर भूमिका घेत असून देशातील हिंदु समाजावर होत असलेल्या आक्रमणांमुळेही वातावरण तणावपूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशाने भारतातील व्हिसा सेवा स्थगित केल्या आहेत.

भारतावर अवलंबून असलेल्या गरजांची पूर्तता

भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो; परंतु सध्याच्या धोरणात्मक भूमिकेमुळे बांगलादेश स्वतःलाच अडचणीत ढकलत आहे. गहू, तांदूळ, साखर, कांदा, बटाटा, मसाले, फळे, भाज्या, कापूस, औषधे, इंधन आणि अगदी वीजपुरवठा यांपैकी मोठा वाटा भारताकडून जातो. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १६ अब्ज डॉलर्स (१३ लाख ४८ सहस्र कोटी रुपये) इतका होता. भारत बांग्लादेशाकडून सुमारे २ अब्ज डॉलर्सचा (१ लाख ६६ सहस्र कोटी रुपयांचा) माल खरेदी करतो, तर निर्यात १४ अब्ज डॉलर्सपेक्षा (११ लाख ६२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा) अधिक आहे. याखेरीज भारताने सुमारे ८ अब्ज डॉलर्सचे (६ लाख ६४ सहस्र कोटी रुपयांचे) अर्थसाहाय्य केले आहे, ज्यातून रस्ते, रेल्वे आणि बंदर यांची उभारणी करण्यात आली.

वीजपुरवठ्यात भारताची मोठी भूमिका

बांग्लादेशामधील एकूण वीजउत्पादनात भारताचा वाटा सुमारे १७ टक्के आहे. म्हणजे भारताकडून होणारा पुरवठा थांबला, तर देशातील उद्योगधंदे आणि दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होईल. भारतातील एका खासगी आस्थापनाकडूनच प्रतिदिन सुमारे १ सहस्र ५०० मेगावॅट वीज पुरवठा केला जातो.

भारताविना व्यवस्था चालू शकते का ?

चीन आणि पाकिस्तान यांसारख्या देशांच्या पाठबळावर भूमिका घेत असतांना बांगलादेश भारतावरील अवलंबित्व विसरत आहे; परंतु जवळपास संपूर्ण सीमा भारताशी जोडलेली असतांना आणि दैनंदिन गरजांमध्ये भारताचा मोठा वाटा असतांना, भारतापासून अंतर ठेवून दीर्घकाळ तग धरणे अवघड आहे.

अर्थव्यवस्थेसाठी भारत जीवनदायी 

प्रत्यक्षात बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेला महत्त्वाचा पुरवठा भारताकडूनच होतो. भारताने पाठिंबा काढला, तर देशात महागाई आणि बेरोजगारी वाढेल, तर उत्पादनही घटेल. भारत ज्या अल्प किमतीत बांगलादेशाला माल पुरवतो, त्या तुलनेत इतर कोणत्याही देशाकडून िततक्या स्वस्त किमतीत तो मिळणे कठीण आहे.

कापड उद्योग सर्वांत मोठे बळ

बांगलादेशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कापड उद्योगावर उभी आहे. भारताकडून कापूस घेऊन स्वस्त मजुरीच्या आधारे बनवण्यात येणारे कपडे जगभर निर्यात केले जातात. भारत उत्पादित करत असलेला कापूस आणि ज्यूट उत्पादनांपैकी सुमारे ३५ टक्के बांग्लादेशाला विकतो. हा पुरवठा थांबला, तर कापड उद्योग थेट कोसळेल आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. ऑगस्टपासून आतापर्यंत बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेला सुमारे २ लाख कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा परिस्थितीत भारताविना बांगलादेशला स्थिर रहाणे कठीण ठरणार आहे.