शंकराचार्य, शाही इमाम आणि निधर्मी लोकशाही !

भारतातील ‘सेक्युलर’ (निधर्मी) लोकशाहीचे तीनही स्तंभ आणि चौथा स्वयंघोषित स्तंभ हिंदु-मुसलमान असा भेदभाव कायम करत रहातात. सरकार, व्यवस्था आणि प्रशासन करत असलेला भेदभाव दाखवून दिला, तर ‘हिंदु-मुसलमान करू नका’ नामक पुरोगामी अस्त्र तो भेद दाखवणार्‍यावर फेकून मारले जाते. सरकार काँग्रेसचे कि भाजपचे आहे ?, न्यायाधीश कोण आहेत ?, प्रशासकीय प्रमुख कोण आहेत ? यांवर हा भेदभाव किंवा घाबरणे अथवा न घाबरणे अवलंबून नाही. हे सगळेच मुसलमानांना घाबरतात आणि हिंदूंवर बळजोरी करत असतात. विचारवंतही यात अजिबात मागे नाहीत. वर्ष १९५० ते १९८० या काळात भारताच्या अविकसित अर्थव्यवस्थेला एका विचारवंताने ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हटले होते.

कारण नसतांना दिवाळीच्या दिवशी शंकराचार्यांना अटक आणि अवैध बांधकाम करूनही शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना अटक न होणे !

वर्ष २००४ मध्ये कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना दिवाळीच्या दिवशी झालेली अटक, चाललेला खटला आणि त्याचे माध्यमांवरचे प्रतिबिंब हा यादृष्टीने अभ्यासाचा विषय आहे. वर्ष २०१३ मध्ये त्यांची निर्दोष सुटका झाली. वर्ष २००४ मध्ये झालेल्या अटकेची बातमी सर्व वृत्तमाध्यमांवर महिनाभर ठळकपणे चालू होती; पण निर्दोष सुटल्याची बातमी केवळ २ दिवस टीव्हीवर झळकली, वर्तमानपत्रात एक दिवस झळकली.

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना दिवाळीच्या दिवशी झालेली अटक

वर्ष १९९६ च्या अवैध बांधकामाच्या प्रकरणात वर्ष २००१ मध्ये पहिले अजामीनपात्र अटक वॉरंट आदेश काढण्यात आलेल्या देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी आजवर देहली पोलिसांना सापडले नाहीत. त्यानंतर अनेक प्रकरणात त्यांना न्यायालयाचे कैक समन्स बजावण्यात आले. ते एकदाही न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. ‘त्यांना पकडले, तर दंगली होतील. सामाजिक शांतता बिघडेल’, असे कारण न्यायालयात देत पोलिसांनी खटला रहित करण्याची मागणी केली. न्यायालयाने खटला चालूच ठेवला आणि आजतागायत ते चालूच आहे. स्वत: पाठवलेल्या समन्सना आरोपी उपस्थित रहात नाही, याचे वैषम्य वा अवमान न्यायालयालाही वाटत नाही. वृत्तमाध्यमांना यावर बोलताच येत नाही. काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिन्ही पक्षांची सरकारे देहलीवर आली. आजही शाही इमामला हात लावण्याचे धाडस न सरकारमध्ये आहे, ना प्रशासनात आणि ना न्यायालयात आहे.

लोकशाहीचे तीनही स्तंभ इस्लामला आणि मुसलमानांना प्रचंड घाबरतात (?)

श्री. प्रसन्न बर्वे

कांची कामकोटी शंकराचार्य आणि शाही इमाम यांच्यात भारताचे नागरिक म्हणून असे काय वेगळेपण आहे. दिवाळीच्या दिवशी पूजा करत असलेल्या शंकराचार्यांना अटक करणारे ईदच्या दिवशी नमाज पठण करणार्‍या शाही इमामांना अटक करतील का ?अजिबात नाही ! का ?  एकमेव कारण आहे, ‘लोकशाहीचे तीनही स्तंभ इस्लामला आणि मुसलमानांना प्रचंड घाबरतात.’ राज्यघटना पहा, सरकारचे निर्णय पहा, प्रशासकीय निर्णय पहा आणि न्यायालयाचे निर्णय / निकाल पहा. हे म्हणणे पटेल. ‘कायदा सगळ्यांना सारखा’ आणि ‘कायद्यासमोर सगळे सारखे’ ही दोन अक्षरश: खोटारडी वाक्ये रेटून रेटून सांगितली जातात; पण वस्तूस्थिती त्यापेक्षा पुष्कळ वेगळी आहे.

– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा.