वेदमूर्ती ‘दंडक्रम विक्रमादित्य’ देवव्रत रेखे आणि जातीयवादी जळजळ !

वेदमूर्ती देवव्रत रेखे

१. अत्यंत अवघड साधना करणार्‍या देवव्रत रेखे यांच्यावर केली जाणारी दुर्गंधीयुक्त जातीयवादी गरळओक अत्यंत उद्वेगजनक!

सौ. शेफाली वैद्य

‘गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर एक दृश्य वारंवार दिसत आहे. १९ वर्षांचा मुलगा देवव्रत रेखे, ज्यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या दंडक्रम पारायणासारखी अत्यंत अवघड आणि दुर्मिळ अशी ऐतिहासिक साधना केली ! याआधी २०० वर्षे जे कुणी केले नाही, ते या मुलाने करून दाखवले ! यामागे त्यांची किती वर्षांची साधना आणि परिश्रम आहेत ! देवव्रत यांच्या या यशामागे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा केवढा मोठा त्याग आहे ! काहीही कारण नसतांना त्या कोवळ्या लेकरावर सामाजिक माध्यमांवरून जी काही दुर्गंधीयुक्त जातीयवादी गरळ ओकली जाते, ती अत्यंत उद्वेगजनक आहे.

२. बुद्धीमान आणि निगर्वी देवव्रत !

१९ वर्षांच्या मुलाने प्रतिदिन ४ घंटे, सतत ५० दिवस, २ सहस्र मंत्र कंठस्थ उच्चारले, तेही एकही चूक न करता ! हा मुलगा अत्यंत बुद्धीमान आहे, यात वादच नाही. तो इतर कुठल्याही क्षेत्रात उतरला असता, तरी त्याने ते क्षेत्र आपल्या असामान्य बुद्धीमत्तेने आणि सातत्यपूर्ण परिश्रमाने गाजवलेच असते; पण वेदाभ्यास करणे ही त्याची निवड होती. इतर कुणालाही त्रास न देता वयाच्या ५ व्या वर्षापासून हा मुलगा वेदाभ्यास करत आहे. दंडक्रम पारायणाच्या वेळीही त्याने प्रसिद्धीचा आग्रह धरला नव्हता. ना त्याने कुणाकडे पैसे किंवा अन्य कसलेही साहाय्य मागितले !

३. कौतुकाच्या ऐवजी पदरी अश्लाघ्य टीका हा दुटप्पीपणा जातीद्वेषापोटीच !

एखाद्या १९ वर्षांच्या मुलाने क्रिकेट खेळून शतक काढले असते, ‘आयआयटी’च्या परीक्षेत प्राविण्य मिळवले असते, दूरचित्रवाणीवरील एखाद्या ‘रिॲलिटी शो’मध्ये तो चांगला गायला किंवा नाचला असता, तर त्याच्या वाट्याला केवळ आणि केवळ कौतुकाचा वर्षावच आला असता; पण केवळ ते (देवव्रत) ब्राह्मण आहेत आणि स्वआवडीने वेदाभ्यास करतात; म्हणून त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली, तीही दळभद्री लोकांकडून ! ज्यांना साधे ‘शुभं करोति’ तोंडपाठ म्हणता येत नाही !

४. का इतका द्वेष ? का इतकी जळजळ ?

इतका द्वेष, इतकी जळजळ का ? देवव्रत यांची प्रचंड ‘मेधा’ काही लोकांचा अशक्त अहंकार दुखावतो म्हणून ? १९ वर्षांच्या मुलाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, शृंगेरीचे शंकराचार्य अशा मोठमोठ्या लोकांनी तोंड भरून कौतुक केले म्हणून कि केवळ त्याचे आडनाव रेखे आहे म्हणून?

५. जातीयवादाच्या ‘लिखाणा’द्वारे यश झाकोळायचा प्रयत्न !

या जातीय विद्वेषामागील कारण अगदी साधे-सोपे आहे. देवव्रत यांच्यावर टीका करणार्‍या माणसांकडे स्वतःचा अभिमान बाळगण्याजोगे काहीही नाही. ना साधना, ना कर्तृत्व, ना बुद्धीमत्ता, ना शिस्त, ना परंपरेचा अभिमान, ना असामान्य प्रतिभा ! म्हणूनच सर्वांत सोपे काय? तर जात काढायची. कुणाचेही उज्ज्वल यश पाहिल्यावर जातीयवादाचे लिखाण (पोस्ट) प्रसारित करून ते यश झाकोळण्याचा प्रयत्न करायचा. जातीयवादी टीकाकारांच्या आयुष्यात सर्वांत मोठे यश असेल, ते म्हणजे त्यांच्या जातीयवादी नेत्याच्या वाढदिवसाला मिळालेला एखाद्या उष्ट्या केकचा तुकडा किंवा एखादा शिळा वडा-पाव !

६. टीका करणार्‍यांची १९ वर्षांची पोरे करतात तरी काय ?

‘वेद मुखोद्गत करण्याचा समाजाला उपयोग काय ?’, असे कुत्सितपणे विचारणार्‍या लोकांची १९ वर्षांची पोरे मात्र रात्रंदिवस ‘रिल्स’ (छोटे व्हिडिओ) बघतात, बापाचे पैसे दारूमध्ये उडवतात. त्यांचा तरी समाजाला काय उपयोग असतो ? देवव्रत रेखे एका प्राचीन परंपरेचे रक्षण करत आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते वेदाध्ययन करत आहेत. काशीमध्ये राहून शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यदिन शाखेचा अभ्यासक्रमही त्याने पूर्ण केला आहे. अनुमाने २०० वर्षांनंतर प्रथमच भारतात ‘दंडक्रम’ पूर्ण करणारे तरुण आहेत ते !

७. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या कौतुकास पात्र देवव्रत रेखे !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना सन्मानित करतांना

‘हे सोपे आहे’, असे वाटणार्‍या लोकांनी संस्कृत सोडाच, कुठल्याही मराठी पुस्तकातील एक पान जसेच्या तसे पाठ करून दाखवावे. देवव्रतने जे करून दाखवले, ते म्हणजे कठोर परिश्रम, अथक अभ्यास, अचल निष्ठा आणि प्राचीन परंपरा यांचा महासंगम आहे; म्हणूनच पंतप्रधान मोदींनी त्याला ‘भारताचा गौरव’ असे संबोधले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याला मंचावर बोलावून सन्मानित केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दंडक्रमाला ‘वेदोच्चारांचा मुकुटमणी’ म्हटले.

८. देवव्रत रेखे म्हणजे विकृती, विष आणि पोकळ बुद्धीवाद यांना दिलेले सणसणीत उत्तर होय !

जे दळभद्री लोक स्वतः एक पानही पाठ करू शकत नाहीत, एक श्लोकही अचूक उच्चारू शकत नाहीत, एक दिवस कसलीही शिस्त पाळू शकत नाहीत, ते ५० दिवसांच्या अखंड वेदसाधनेवर टीका करतात, हे किती हास्यास्पद आहे ! देवव्रत रेखे म्हणजे विकृती, विष आणि पोकळ बुद्धीवाद यांना दिलेले सणसणीत उत्तर आहे.

९. जातीयवादी हलाहल हे यशस्वी लोकांच्या नव्हे, तर फेकणार्‍यांच्या चेहर्‍यालाच विद्रूप करते !

त्याच्या साधनेने जगाला दाखवून दिले की, हिंदु ज्ञानपरंपरा आजही जिवंत आहे, तितकीच तेजस्वी आहे ! आजही १९ वर्षांचा एक कोवळा मुलगा या परंपरेला नव्याने उजळवू शकतो. काहीही दोष नसतांना देवव्रत यांच्या वाट्याला आलेले जातीयवादी हलाहल त्यांना किंवा त्याच्या उज्ज्वल यशाला मलीन करत नाही, तर ते फेकणार्‍यांचाच चेहरा विद्रूप होतो.

१०. देवव्रत रेखे हे साधना आणि बुद्धीमत्ता यांच्या बळावर पुढे पुढे जाणार, हे लक्षात ठेवा !

देवव्रत यांचे तेज तुमच्या (टीकाकारांच्या) घाणेरड्या शब्दांनी विझणार नाही. त्यांच्या मनात वेदमंत्र आहेत, तुमच्या भाषेत आहे ती केवळ जातीयवादाची गरळ ! भारताच्या इतिहासात देवव्रत यांचे नाव अभिमानाने लिहिले गेले आहे. तुम्हाला तुमच्या गल्लीच्या कोपर्‍यावर उभा असलेला पानवालाही ओळखणार नाही. देवव्रत रेखे यांच्या कर्तृत्वाला तुमचा द्वेष काहीही करू शकत नाही. ते त्यांची साधना आणि बुद्धीमत्ता यांच्या बळावर पुढे पुढे जाणार. तुम्ही मात्र जातीयवादाच्या चिखलातच बरबटलेले रहाणार !

– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका, पुणे.

संपादकीय भूमिका 

ज्यांना श्लोक उच्चारता येत नाहीत, त्यांनी वेदमूर्ती देवव्रत यांच्यावर जातीयवादी टीका करणे, म्हणजे ‘सूर्यावर थुंकण्याचा प्रकार’ होय !