Shankhnad Mahotsav Delhi : उत्तर भारतात छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा प्रसार करणारा सर्वांत मोठा महोत्सव ! – उदय माहुरकर, अध्यक्ष, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’

  • देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे भव्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

  • शिवकालीन दुर्मिळ शस्त्रप्रदर्शनीसह देशाच्या सुरक्षेविषयी तज्ञांची होणार चर्चा !

(डावीकडून) श्री. चेतन राजहंस, श्री. अभय वर्तक, बोलतांना श्री. उदय माहुरकर, सद्गुरु चारुदत्त पिंगळे आणि अधिवक्त्या अमिता सचदेवा

नवी देहली : छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या लढ्यामुळेच मोगल साम्राज्याचा अंत झाला. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यामागील पराक्रम देशात सांगितला गेला नाही. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात छत्रपती शिवरायांचे शौर्य मोठ्या प्रमाणात प्रस्तुत केले जाणार आहे. उत्तर भारतात छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा प्रसार करणारा हा सर्वांत मोठा महोत्सव आहे, असे विधान ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी केले. १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथील ‘भारत मंडपम्’मध्ये ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि श्री. चेतन राजहंस आणि सर्वाेच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा उपस्थित होत्या.

या वेळी श्री. उदय माहुरकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशावर डाव्या विचारसरणीचा पगडा असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, महाराणा प्रताप, चक्रधरस्वामी आदी संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याचा प्रसार करण्यात आला नाही. राष्ट्रपुरुषांच्या पराक्रमाच्या इतिहासातून देशात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यास साहाय्य झाले असते. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे संपूर्ण देशात राष्ट्रीत्वाची भावना निर्माण होईल. प्रत्येक भारतियाने या महोत्सवातील प्रदर्शन पहावी.’’

भावी पिढीपुढे सनातन राष्ट्राचा आदर्श निर्माण करणारा महोत्सव ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

सनातन राष्ट्र हा भारताचा आत्मा आहे. भारतातील संतांनी विश्वातील प्रत्येक देशात सनातन धर्माचा विचार पोचवला आहे. संपूर्ण विश्व सनातन धर्माकडे आकृष्ट होत आहे. विश्वाचा ‘आध्यात्मिक गुरु’ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. अशा वेळी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाद्वारे भावी पिढीपुढे सनातन संस्कृतीचा आदर्श निर्माण होईल. युवा पिढीमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी २५० हून अधिक प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शन महोत्सवात असणार आहे. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. भावी पिढीमध्ये संस्कृती रक्षणासाठी शौर्य निर्माण करतील, अशी प्राचीन शस्त्रांची प्रात्यक्षिकेही महोत्सवात सादर केली जाणार आहेत.

विविध देशांतून ८०० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

८०० हून अधिक संघटना आणि विविध देशांतील प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी हाेणार आहेत. महोत्सवात ‘राष्ट्ररक्षण’, ‘शहरी नक्षलवाद’ आदी विषयांवर विचारमंथन होणार आहे. महोत्सवाची माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच त्यात सहभागी होण्यासाठी ‘SanatanRashtraShankhnad.in’ या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, तसेच कार्यक्रमस्थळी येतांना समवेत शासकीय ओळखपत्र आणावे.

सनातन परंपरेचे रक्षण आणि प्रचार यांसाठी महोत्सवाचे आयोजन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहास हा देशाचा आत्मा आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीमुळे आपण पाश्चात्त्य गुलामगिरीच्या मानसिकतेकडे झुकलो. गुलामगिरीची मानसिकता सोडून आपण सनातन संस्कृतीचा अंगीकार करायला हवा. यासाठी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आपण जपला पाहिजे. हा वारसा पुन्हा जागृत करण्यासाठीच सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आहे. सनातन राष्ट्राच्या कार्यात योगदान देणारे महोत्सवात एकत्रित येणार आहेत. विश्वाचे कल्याण केवळ सनातन परंपराच करू शकते. विनाशकाळात विश्वाला वाचवण्यास समर्थ असलेल्या सनातन परंपरेचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठीच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिवक्ते आणि निवृत्त न्यायाधीश महोत्सवात सहभागी होणार ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्त्या (श्रीमती) अमिता सचदेवा, देहली

विविध राज्यांतील ‘बार असोसिएशन’शी संपर्क करून त्यांना सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे. अनेक वरिष्ठ अधिवक्ते आणि निवृत्त न्यायाधीश महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत. न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून रहावा, या दृष्टीनेही महोत्सवामध्ये चर्चा होणार आहे.

(चित्रावर क्लिक करा)