हुमायू कबीर यांना अटक करा ! – अयोध्येतील संतांची मागणी  

हुमायू कबीर

अयोध्या (उत्तरप्रदेश) : राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात कोणतीही कृती सहन केली जाणार नाही. बाबराच्या नावाने बांधकाम करणे राष्ट्रहिताच्या विरोधात आहे. अशी कृती करणार्‍यांना संत समाज योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध आहे. हुमायू कबीर यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अयोध्येतील जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी केली. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायू कबीर यांनी मुर्शिदाबाद येथे यांनी बाबरी मशिदीची पायाभरणी केल्यावरून ही मागणी करण्यात आली. हनुमानगढीचे मुख्य पुजारी राजू दास यांनीही हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले आणि देशातील हिंदूंनी जागरूक रहाण्याची आवश्यकता व्यक्त केली.

दंतधावन कुंड पीठाचे पीठाधीश्वर महंत विवेक आचारी यांनी सांगितले की, आता देशात बाबराच्या नावावर कोणतेही बांधकाम होऊ नये. देश प्रगतीच्या मार्गावर आहे आणि सनातन संस्कृतीचा गौरव जगभर पोचत आहे. अशा वेळी हुमायू कबीर यांची कृती देशाचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे.

बाबराच्या नावाने मशीद उभारू नये ! – बाबरीचे माजी पक्षकार इकबाल अंसारी

बाबरी प्रकरणातील माजी पक्षकार इकबाल अंसारी यांनी म्हटले की, ही घटना राजकीय आहे. श्रीरामजन्मभूमी आणि बाबरी यांचा आता कोणताही वाद शिल्लक नाही. न्यायालयाने दिलेला निकाल सर्व मुसलमानांनी मान्य केला. बंगालमध्ये निवडणुका जवळ येत असल्याने बाबराच्या नावाने मशीद उभारण्याची चर्चा पुढे केली जात आहे. बाबराच्या नावाने मशीद उभारू नये; कारण तो कोणताही मार्गदर्शक किंवा उदात्त व्यक्ती नव्हता.