सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ५ लाख ३५ सहस्र खाती गोठवली !

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सांगली, १ डिसेंबर (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५ लाख ३६ सहस्र खातेदारांची खाती रि-केवायसी (ग्राहकाला जाणून घेण्याच्या प्रक्रियेचे नुतनीकरण) अभावी गोठवण्यात आली होती. यांपैकी ६५ सहस्र ६९८ खातेदारांनी बँकेशी संपर्क साधून रि-केवायसी पूर्ण केली आहे. अद्यापही अनुमाने ५ लाख ३५ सहस्र खातेदारांनी रि-केवायसी न केल्याने त्यांची खाती गोठवलेलीच आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने रि-केवायसी नसलेल्या ५ लाख ३६ सहस्र खात्यांवर निर्बंध लागू केले. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेने खातेदारांना वारंवार रि-केवायसी करण्याचे आवाहन केले होते; मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला रि-केवायसी पूर्ण न करणार्‍या खात्यांविषयी दंडात्मक कारवाई करण्याची चेतावणी दिली होती. राज्यातील अन्य बँकांवर अशा कारवाया झाल्याने जिल्हा बँक प्रशासनाने ५ लाख ३६ सहस्र खातेदारांना संदेश पाठवून त्वरित रि-केवायसी करण्याचे आवाहन केले.