‘गुजरात, हरियाणा आणि राजस्थान आमचे आहेत !’ – पाकच्या सिंध प्रांताचे मंत्री सय्यद सरदार अली शाह

राजनाथ सिंह यांच्या ‘सिंध उद्या भारतातही परत येईल’ या विधानावर पाकच्या सिंध प्रांताचे मंत्री सय्यद सरदार अली शाह यांचे बालीश विधान

पाकच्या सिंध प्रांताचे मंत्री सय्यद सरदार अली शाह

कराची (पाकिस्तान) – गुजरात, हरियाणा आणि राजस्थान आमचे आहेत. आम्ही हे सिद्ध करून दाखवू, असे बालीश विधान पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मंत्री सय्यद सरदार अली शाह यांनी केले आहे. सिंधच्या विधानसभेत त्यांनी हे विधान केले. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सिंधशी संबंधित विधानावरील त्यांची ही प्रतिक्रिया आहे. अली शाह म्हणाले की, जर भारत सिंधवर टिप्पणी करू शकतो, तर मीही भारताच्या राज्यांवर दावा करू शकतो.

काय बोलले होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ?

राजनाथ सिंह यांनी २३ नोव्हेंबरला देहलीतील सिंधी लोकांच्या कार्यक्रमाला संबोधित करतांना म्हटले होते की, आज सिंधची भूमी भारताचा भाग नसली, तरी सभ्यतेनुसार सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. भूमीच्या संदर्भात बोलायचे झाले, तर सीमा कधीही पालटू शकते. उद्या कदाचित् सिंध पुन्हा भारतात परत येईल.

सिंह यांच्या विधानाचे ‘जेय सिंध मुत्तहिदा महाज’ संघटनेने केले स्वागत !

सिंह यांच्या या विधानाचे ‘जेय सिंध मुत्तहिदा महाज’ या सिंधमधील नेते शफी बुरफत यांनी जोरदार स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, हे विधान सिंधी लोकांसाठी ऐतिहासिक, उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. हे विधान सिंधच्या स्वातंत्र्याची आणि भारतासमवेत भविष्यात सशक्त संबंधांची आशा निर्माण करते. आम्ही आरंभीपासूनच या विचारावर विश्वास ठेवत आलो आहोत की, सिंध आणि भारत यांच्यात सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक अन् भावनिक संबंध आहेत.

संपादकीय भूमिका

स्वतःचा देश एकसंध राखू न शकणार्‍या पाकच्या मंत्र्यांचे हे विधान हास्यास्पद आणि त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड करणारे आहे ! ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ यातला हा प्रकार आहे !