आम्हाला नमक हरामांची मते नको ! – Giriraj Singh

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे धर्मांध मुसलमानांविषयी विधान !

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

पाटलीपुत्र (बिहार) – जो एखाद्याने केलेले उपकार मानत नाही, त्याला काय म्हणतात ? ‘नमक हराम’ म्हणतात. मौलवी साहेब, आम्हाला नमक हरामांची मते नको आहेत, असे विधान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी अरवाल येथे निवडणूक प्रचारसभेतील भाषणात केले. या प्रचारसभेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उपस्थित होते.

गिरिराज सिंह म्हणाले की, मी मौलवींना विचारले, ‘आयुषमान कार्ड (केंद्र सरकारचे वैद्यकीय सुविधा देणारे कार्ड) मिळाले का ?’ त्यांनी सांगितले ‘हो’ मिळाले. मी विचारले, ‘हिंदु-मुसलमान भेदभाव झाला का ?’ ते म्हणाले, ‘नाही.’ मग मी विचारले, ‘चांगले झाले, तुम्ही आम्हाला मत दिले होते का ?’ ते म्हणाले, ‘दिले होते.’ मी म्हटले, ‘अल्लाचे नाव घेऊन सांगा’, तर ते म्हणाले, ‘नव्हते दिले.’ (खोटारडे मौलवी ! – संपादक) मग मी त्यांना विचारले, ‘नरेंद्र मोदी किंवा आम्ही काही शिवीगाळ केली होती का ?’ तर ते म्हणाले ‘नाही.’ मग मी त्याला ‘आम्हाला नमक हरामांची मते नको’, असे सांगितले.

नितीश कुमार यांच्या पक्षाने केला निषेध !

गिरिराज सिंह यांच्या विधानावर मित्र पक्ष संयुक्त जनता दलाने अप्रसन्नता व्यक्त केली. पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार हे या सभेत उपस्थित होते. ते म्हणाले की, गिरिराज सिंह यांचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच्या विरुद्ध आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’, असे मोदी म्हणाले होते. (आता भाजपकडून अशा प्रकारच्या घोषणा देणे बंद झाले आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मुसलमानांच्या मतांसाठी नव्हे, तर सर्वसमावेशकतेसाठी काम केले आहे. (त्याचे ‘फळ’ त्यांना येत्या निवडणुकीत मिळाल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक)

(म्हणे) ‘गिरिराज सिंह यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा !’ – राजद

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने गिरिराज सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता म्हणाले की, गिरिराज सिंह यांच्यासारख्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मंत्रीमंडळातून काढले पाहिजे; पण ते तसे करणार नाहीत; कारण भाजपचे राजकारण हे प्रामुख्याने द्वेषावर अवलंबून आहे. त्यामुळे गिरिराज सिंह यांच्यासारख्या व्यक्ती मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशी चिथावणीखोर विधाने करतात. (जातीय राजकारण आणि भ्रष्टाचार करणार्‍यांनी अन्यांवर अशा प्रकारचे आरोप करणे हास्यास्पद ठरते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘धर्मांध मुसलमान भाजपला मते देत नाहीत आणि देणारही नाहीत’, हे जगजाहीर असतांना भाजपने त्यांच्याऐवजी हिंदूंसाठी भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !