प्रदूषित फटाके…नकोच !  

सध्या काही ठिकाणी काही प्रमाणात फटाके वाजवण्याचे प्रमाण न्यून झाले असले, तरी अपेक्षित असे नाही. दिवाळी म्हटले की, फटाके हे प्राधान्याने येतातच !; परंतु हे समीकरण सध्याच्या काही दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे. आता लोकसंख्येच्या विस्फोटासमवेत फटाक्यांचे स्फोटही, म्हणजे फटाके वाजवण्याचे प्रमाणही वाढले आहे. फटाके हे केवळ दिवाळीपुरते मर्यादित राहिले नसून विवाह, कौटुंबिक कार्यक्रम, वाढदिवस, क्रिकेटचे सामने, नवीन वर्षारंभ आणि इतरही अनेक सणांना फटाके वाजवण्याची अयोग्य प्रथा रूढ झाली आहे. काही फटाक्यांवर देवतांची चित्रे असतात. हे फटाके फोडल्यानंतर देवतांची चित्रे अर्धवट स्थितीत रस्त्यावर पडलेली असतात. त्यामुळे देवतांचे विडंबन होते. फटाक्यांचे अनेक दुष्परिणाम असल्याचे समोर येऊनही फटाके वाजवणे बंद करण्याची इच्छा अपेक्षित त्या प्रमाणात समाजात दिसून येत नाही.

फटाक्यांमुळे ध्वनी आणि हवा यांचे प्रदूषण, तापमानवाढ होते, ज्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य यांवर गंभीर परिणाम होतात. फटाक्यांमुळे हवेत कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे विषारी वायू आणि शिसे, ॲल्युमिनियम, मँगनीज यांचे कण मिसळतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता घटते आणि हवेची दृश्यमानता न्यून होते. हे प्रदूषण माती आणि जलस्रोत यांमध्ये मिसळून दीर्घकाळासाठी हानी पोचते, तसेच फटाके वाजवतांना झालेल्या अपघाताच्या कित्येक घटना नेहमी दिवाळीत ऐकायला मिळतात. काही जणांना फटाक्याच्या नादात जीवही गमवावा लागला आहे. मागील आठवड्यातच सांगलीतील एका फटाक्यांच्या कारखान्यात दारूचा स्फोट होऊन काही जण घायाळ झाल्याची बातमी आली; परंतु कोणत्याही प्रकारच्या हानीचा विचार न करता सगळीकडे सर्रासपणे फटाके वाजवणे चालू असते.

काही पर्यावरणवादी फटाक्यांविषयी दुटप्पीपणाची भूमिका घेतात. हिंदु धर्मातील सणांना विरोध म्हणून दिवाळीच्या फटाक्यांचा त्यांना त्रास होतो, असे म्हणतात; परंतु ख्रिस्त्यांच्या सणाच्या दिवशी वाजवल्या जाणार्‍या फटाक्यांविषयी ते कधी आक्षेप घेत नाहीत, असो. त्यांचे वागणे कसेही असले, तरी खरेच फटाके बनवणे आणि वाजवणे इतके महत्त्वाचे आहे का की, ज्यामुळे आपली केवळ हानीच होत आहे ! याचा मात्र प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायला हवा. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी केवळ फटाके वाजवणे, हेच एक माध्यम नाही. याविषयी समाजात अजून जागृती होणे आवश्यक आहे. फटाक्यांवर बंदी घालण्यासारख्या राष्ट्रासाठी हितकारक असणार्‍या निर्णयावर शासनाने कठोरपणे कार्यवाही करायला हवी आणि जनतेनेही त्याला योग्य प्रतिसाद देऊन स्वहितासमवेत राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायला हवे !

– श्री. ऋषिकेश गायकवाड, पनवेल.