Mumbai HC Potholes Rulling : खड्ड्यात पडून मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ६ लाख रुपयांची हानीभरपाई मिळणार

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय !

मुंबई – रस्त्यावरील  खड्डे आणि उघडे मॅनहोलमध्ये (भूमीगत जलवाहिनीत) पडून मृत्यू पावलेल्यांचे कुटुंबीय हानीभरपाईसाठी पात्र आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पडून मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना ६ लाख रुपयांची हानीभरपाई मिळणार आहे. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये घायाळ झालेल्या नागरिकांना ५० सहस्र ते अडीच लाखांपर्यंत भरपाई द्यावी लागेल. सुस्थितीतील आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होणे, हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे खड्डे किंवा भूमीगत जलवाहिनी यांत पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ६ लाख रुपये, तर घायाळांना दुखापतीचे स्वरूप आणि गांभीर्य पाहून ५० सहस्र ते अडीच लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाने सांगितले की,

१. रस्त्यांच्या स्थितीविषयी अनेकदा आदेश देऊन आणि प्राधिकरणाकडून आश्वासन देऊनही कृती केवळ कागदावर रहाते.

२. खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापती, हे नेहमीचे झाले असून त्यास महापालिका अधिकारी उत्तरदायी आहेत. त्यासमवेतच भरपाईची रक्कम दावा निकाली निघाल्याच्या दिनांकापासून ६ ते ८ आठवड्यांत वितरित केली जाईल. यात प्राधिकरण अपयशी ठरल्यास महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रधान सचिव यांना वैयक्तिकरित्या उत्तरदायी धरले जाईल.